Disha Salian : हातात फलक, मूक आंदोलन आणि सर्वात मोठी मागणी; शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Mar 20, 2025 | 12:03 PM

दिशा सालियनच्या अकस्मात मृत्यू प्रकरणी पाच वर्षांनंतर तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि दिशाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत.

Disha Salian : हातात फलक, मूक आंदोलन आणि सर्वात मोठी मागणी; शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
शिंदे गट आक्रमक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पाच वर्षांपूर्वी दिशा सालियान हिचा अकस्मात मृत्यू झाला, हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही त्यांची मागणी आहे. पाच वर्षांवी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यावर केस दाखल करून त्यांना अचक करून चौकशी करावी अशी सत्ताधाऱ्यांची मागणी आहे. तर औरंगजेबाचे प्रकरण अंगावर शेकल्याने त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. दिशा सालियन प्रकरणावरू आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्ययाप्रकरणी दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.

हातात फलक, मूक आंदोलन आणि…

याच मुद्यावरून शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे कायंदे म्हणाल्या. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे यांनी सांगितलं.

दिशाच्या वडिलांनी ही हत्याच असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एखाद्या व्यक्तीची बॉडी 14 व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही, डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा, असं त्या म्हणाल्या. 14 व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी झाली पाहिजे असे कायंदे यांनी नमूद केलं.

आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत तर त्या दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलाय. त्यामागे निश्चित काही कारणं किंवा त्यांची माहिती असेल. आधीची काही पार्श्वभूमी असेल. आमचे एवढेच म्हणणे आहे की त्या दुर्दैवी वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयकडे हे प्रकरण पुन्हा सोपवावे व नव्याने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

किशोरी पेडणेकरांचीही चौकशी करा

दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचेही नाव असून त्यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचाच दाखल कायंदे यांनी दिला. ‘ माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्या तरुणीच्या वडिलांवर दबाव आणला, त्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, सतत खोटी माहिती त्यांना का देण्यात आली, जे पुरावे देण्यात आले तेच खरे आहेत हे त्यांनी मानावं यासाठी त्यांना नजर कैदेत ठेवलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर किशोरी पेडणेकर यांना द्यावी लागतील’ अशी मागणी कायंदे यांनी केली.

पोलीस तपास पूर्ण करण्यासाठी नव्हे तर कोणाला तरी वाचवण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी काम करतायेत असा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेत केला आहे. योग्य पद्धतीने फॉरेन्सिक तपास करण्यात आला नाही, घाईघाईत हे प्रकरण आत्महत्या आहे असं सांगून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे तर पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा बोगस तयार करण्यात आला त्याच्यामध्ये वैद्यकीय पुरावे नष्ट करण्यात आले, हे सगळे आरोप या याचिकेत नोंदवण्यात आले आहेत. हे सत्य असतील तर ही सगळी अतिशय गंभीर परिस्थिती आहे. पोलिसांच्या भूमिकेवर यात खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अर्थात, त्यासाठी त्यांच्यावर तितक्याच मोठ्या व्यक्तीचा दबाव असणार, त्याशिवाय असं कोणी करू धजणार नाही, अशी शंका आमदार डॉ. कायंदे यांनी व्यक्त केली.