नारायण राणेंना महाविकासआघाडीतील नेत्यांना धमकी देणं महागात पडणार? शिवसेना खासदाराने थेट पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार, पत्रात म्हणाला…

| Updated on: Aug 31, 2024 | 2:23 PM

नारायण राणे यांनी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच शिवभक्त यांना घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशी उघडपणे धमकी दिली. आता यावरुन नारायण राणे अडचणीत आले आहेत.

नारायण राणेंना महाविकासआघाडीतील नेत्यांना धमकी देणं महागात पडणार? शिवसेना खासदाराने थेट पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार, पत्रात म्हणाला...
Follow us on

 Vinayak Raut Letter To PM Narendra Modi : सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र यावेळी नारायण राणेंचे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यावेळी नारायण राणे यांनी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच शिवभक्त यांना घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशी उघडपणे धमकी दिली. आता यावरुन नारायण राणे अडचणीत आले आहेत.

माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्राद्वारे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे लेखी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. नारायण राणे यांनी दिलेल्या जाहीर धमकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी या पत्रात केली आहे.

विनायक राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. यानंतर सोमवारी 26 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या मनात संतापाची लाट पसरली आहे.

याच पार्श्वभूमीवर 28 ऑगस्ट 2024 रोजी मालवण शहरात जनतेने स्वयंघोषित बंद पाळला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. आदित्य ठाकरे आणि इतर उपस्थित वरिष्ठ नेत्यांबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली होती. याचवेळी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे आणि त्यांच्या काही गुंड समर्थकांनी तिथे पोहोचून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार नारायण राणे यांनी घरात घुसून रात्रभर एकेकाला मारून टाकेन अशी धमकी उघडपणे दिली. सदर घटनेचे इत्यंभूत चित्रण वृत्तवाहिन्यांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये आलेले आहे. सोबत वृत्तपत्रातील कात्रणे तसेच वृत्तवाहिन्यांच्या चित्रांच्या चित्रफिती पेन ड्राईव्हद्वारे आपल्याकडे सादर करीत आहे

खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाची गुंडगिरीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर अनेक दहशत, दादागिरी, खून असे गुन्हे या पूर्वीपासून दाखल आहे. त्यांची दहशतवादी प्रवृत्ती आहे. तरी याबाबत सदरच्या जाहीर धमकीच्या अनुषंगाने खासदार नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी

त्यामुळे आपणास विनंती आहे की ही घटना अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. याकडे लक्ष देऊन खासदार नारायण राणे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून देशातील जनतेच्या मनात एक उत्तम व तत्पर प्रशासक म्हणून आपली प्रतिमा कायम राहील”, असे विनायक राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.