जागावाटप कधी? मुख्यमंत्रि‍पदासाठी कोण इच्छुक? ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याकडून गुपित उघड, ‘या’ दिवशी पहिली यादी येणार

| Updated on: Oct 08, 2024 | 11:35 AM

"जर हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या असत्या तर भाजपचा निश्चितच पराभव झाला असता. आता महाराष्ट्रात निवडणुका होतील, त्यात आम्हाला महाविकासाआघाडीला मिळून १७५ ते १८० जागा मिळतील"

जागावाटप कधी? मुख्यमंत्रि‍पदासाठी कोण इच्छुक? ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याकडून गुपित उघड, या दिवशी पहिली यादी येणार
उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले
Follow us on

Maha Vikas Aghadi First Candidate List : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून कोणकोणत्या मतदारसंघावर विधानसभा निवडणूक लढवायची याची चाचपणी सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण रंगले आहे. महाविकासआघाडीतही मुख्यमंत्रिपदावरुन धुसफूस पाहायला मिळत आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागावाटप कधी जाहीर होणार, मुख्यमंत्रि‍पदासाठी कोण इच्छुक आहे यांसह अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. जर हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या असत्या तर भाजपचा निश्चितच पराभव झाला असता. आता महाराष्ट्रात निवडणुका होतील, त्यात आम्हाला महाविकासाआघाडीला मिळून १७५ ते १८० जागा मिळतील. भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निश्चितच हरणार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

“राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही”

महाराष्ट्रात राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. येथे काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे साहेब हे देखील आहेत. प्रियांका गांधी, राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. काँग्रेसकडे जर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर त्यांनी जाहीर करावा. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की चेहरा असेल तर जाहीर करा, आम्ही त्यांना पाठिंबा देतो लोकांमध्ये संभ्रम नको अशी शिवसेनेची भूमिका आहे. राज्याचे नेतृत्व कोण करणार असा संभ्रम निर्माण व्हायला नको म्हणून ही शिवसेनेची भूमिका आहे. खांद्यावर कोणाचं मुंडक आहे हे लोकांना दिसला पाहिजे. नुसतं धड असून काय उपयोग, असे संजय राऊत म्हणाले.

आम्हाला जागावाटप कसे व्हायला पाहिजे, याची माहिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकासआघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो, येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हायकमांड महाराष्ट्र मुंबईत आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच निवडणूक लढू. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला मुख्यमंत्रीपद हवं आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून नक्कीच जिंकतील

यावेळी त्यांना प्रिया दत्त यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढण्याच्या चर्चांबद्दल विचारणा करण्यात आली. “प्रिया दत्त या वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्याचे स्वागत करतो. आम्ही त्यांच्या उमेदवाराची स्वागत करतो आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्या यावेळी निवडणूक जिंकतील”, असे संजय राऊत म्हणाले.