टाटा गेल्याचं दु:खं वाटतं, पण मिठागरे गिळणारे का जात नाहीत?; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 12, 2024 | 10:09 PM

आपल्या जेवणातील लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आजचे उद्योगपती मिठागरे गिळत आहे. टाटा गेल्याचं दुख वाटतं, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टाटा गेल्याचं दु:खं वाटतं, पण मिठागरे गिळणारे का जात नाहीत?; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Follow us on

Uddhav Thackeray On Ratan Tata Passed Away : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी (10 ऑक्टोबर) वरळीतील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरपला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

नुकतंच दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी संबोधित केले. या मेळाव्याला ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी रतन टाटा यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी रतन टाटा यांची एक गोड आठवणही सांगितली.

टाटा गेल्याचं दुख वाटतं आणि…

“आजपासून प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून या सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं दुर्मिळ झालं. टाटांसारखे उद्योगपती विरळ असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. आपल्या जेवणातील लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आजचे उद्योगपती मिठागरे गिळत आहे. टाटा गेल्याचं दुख वाटतं. आणि मिठागरे गिळणारे जात का नाही याचं वाईट वाटतं. जे जायला पाहिजे ते जात नाही, जे जाऊ नयेत ते जात आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी भाजपला लाथ घातली”

यानंतर भाषणावेळी उद्धव ठाकरेंनी रतन टाटा यांची आठवण सांगितली. “शिवसेना प्रमुख गेल्यावर टाटा आले होते. ते म्हणाले तुला आणि मला मोठा वारसा आहे. तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभला. तसा मला जेआरडी टाटांचा वारसा आहे. मी जेव्हा कामाला सुरुवात केली. तेव्हा निर्णय घेताना आज जेआरडी असते तर काय केलं असतं हे मला वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की जे आरडीने माझं काम पाहिलं. स्टाईल पाहिली. मग त्यांनी जबाबदारी दिली. तशी तुझ्यावर शिवसेनाप्रमुखांनी तुझ्यावर जबाबदारी दिली. तुझी निवड केली. तुझ्यावर वारसा दिला. त्यामुळे तुला जे योग्य वाटतं तेच कर. मी आज तेच करतो. म्हणून मी भाजपला लाथ घातली”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

“मला कुणाची पर्वा नाही”

“ही लढाई साधी नाही. एकाबाजूला अब्दाली, केंद्राची माणसं, सत्ता, तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या गावंच्या गावं उद् ध्वस्त करायची. आता त्यांनी मनसुबा आखलाय उद्धव ठाकरेंना संपवायचं. पण त्यांनना माहीत आहे, उद्धव ठाकरेंकडे ही समोरची वाघनखं आहेत. तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहूच शकलो नसतो. तुम्ही आई जगदंबेसारखे उभे राहिला. मला कुणाची पर्वा नाही. त्यांच्या कितीही पिढ्या येऊ द्या. मी त्यांना गाडून उभा राहील”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.