Uddhav Thackeray | “नाट्यगृह आम्ही दिलं पण काही लोकं…”, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका

| Updated on: Jul 29, 2023 | 10:07 PM

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता बोचरी टीका केली.

Uddhav Thackeray | नाट्यगृह आम्ही दिलं पण काही लोकं..., उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका
Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे पाहिलं जात आहे. या सभेला खासदार राजन विचारे आणि संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका केली. काही जणांना वाटतं आम्ही म्हणजे ठाणे, तर तसं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“ठाण्यात नाट्यगृह नव्हतं ही बाब बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली गेली. तेव्हा उपस्थित जनसमुदायाला त्यांनी सांगितलं की, सत्ता द्या मी तु्म्हाला नाट्यगृह देतो. सत्ता आली आणि गडकरी रंगायतन नाट्यगृह तयार झालं. आम्ही नाट्यगृह दिलं पण नाटक काही लोक करत आहेत. आज हा जोश बघून काही लोकांची झोप नक्कीच उडाली असेल आणि उडाली पण पाहीजे. काही जणांना वाटतं मी म्हणजे ठाणे..पण तसं काही नाही. ठाणे आणि शिवसेना यांचं नातं आहे..ते पण खरी शिवसेना.. खरी शिवसेना यासाठी संबोधलं कारण मार्केटमध्ये चायनीज माल पण येतो. मालच नाही देवाच्या मूर्तीही येतात. असेच काही चायनीज बनावट लोक बोगस..गद्दार..स्वत:ला समजतात की मी शिवसेनेहून वर आहे. पण तू इतक्या वर जाऊ शकत नाही. त्याच्या वर गेलं तर परत येणार नाही.”,  अशी अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“राजन विचारे त्यांचे साथीदार माझ्यासोबत बसले आहेत. कट्टर शिवसैनिक आहेत. ही आमची परीक्षा आहे. ही परीक्षा नसून एक संधी आहे. परीक्षा जेव्हाच होते तेव्हा कठीण वेळ येते. जे लढताना सोबत असतात ते खरे सैनिक असतात आणि तुम्ही माझ्यासमोर आहात. 50 खोके एकदम ओके..ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे ते काय आम्हाला न्याय देणार..”, असं उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.

“मी पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ संविधानाच्या आधारावर होती. मी शपथ घेतानाच सांगितलं होतं की कोणासोबत भेदभाव करणार नाही. आपसात लढाई का करायची आहे? कोरोना काळात जे करायचं होतं ते मी केलं. हे फक्त माझ्या नशिबात होतं. महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबाचं सदस्य मानते. यात सर्व लोकं आली. यात हिंदुत्व तर आहेच.”, असंही ते पुढे म्हणाले.

“मी काँग्रेससोबत गेलो.. हा गेलो..खुलेआम गेलो..अर्ध्या रात्रीत लपून छपून मिटींग नाही केली. मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्याची वेळ कोणी आणली. भाजपासोबत आम्ही 25 वर्षे होतो. हिंदुत्वासाठी ही आमची मजबूत युती होती. ही युती कोणी तोडली. भाजपाने ही युती तोडली.  गळ्यात पट्टे बांधून गेले ना तसा पट्टा माझ्या गळ्यात बांधणार अजून जन्मास आलेला नाही. कारण बाळासाहेबांचं रक्त माझ्या नसानसात आहे. मी लाचार किंवा गुलाम होणार नाही.”, असंही उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना सांगितलं.