31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा

| Updated on: Nov 23, 2023 | 3:27 PM

आदित्य ठाकरे यांच्या आजपासून कोकणात खळा बैठका होत आहेत. आदित्य ठाकरे अंगणात बसून पदाधिकारी, ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. त्यांचा दोन दिवसांचा कोकण दौरा असणार आहे. या निमित्ताने पदवीधर निवडणुकीचाही आदित्य ठाकरे आढावा घेत आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी दीड वाजता कुडाळ बांबार्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराच्या खळ्यामध्ये आदित्य ठाकरे हे सर्वांशी संवाद साधणार आहेत

31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
aditya thackeray
Follow us on

सावंतवाडी | 23 नोव्हेंबर 2023 : राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या 31 तारखेपर्यंत किंवा त्या आधी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा. तसेही या सरकारला जास्त दिवस राहिले नाहीत. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडीत खळा बैठकीनंतर त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.

मुंबई महापालिकेने मुंबईतील डिलाईल रोड येथील पूलाचं लोकार्पण केलं. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महापालिकेवर जोरदार टीका केली. 31 तारखेपर्यंतच खोके सरकार टिकणार आहे, हे मला महापालिकेला सांगायचं आहे. मी बाहेर पडण्याची पालिका वाट बघत होते तर आधीच सांगायचं होतं. मी आधीच कोकणात दौरा करायला आलो असतो. यांनी डिलाईल रोडचं डिले रोड केलं आहे. आम्ही जनहितासाठी रस्ता उघडला आहे. पण आमच्यावर केसेस टाकल्या. तरीही दहा दिवसासाठी रस्ता बंद केला आहे. बिल्डर मंत्री आहे. दुसरेही एक मंत्री आहेत. त्यांनी पालिकेत अतिक्रमण केलं आहे. त्यांना मिळाला म्हणून त्यांनी उद्घाटन केलंय. आता मुंबई ट्रान्सहर्बर लिंकचंही उद्घाटन झालं पाहिजे. डिसेंबर अखेरपर्यंत थांबू नये, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांमध्ये उत्साह

यावेळी आदित्य ठाकरे यांनी खळा बैठकीवरही भाष्य केलं. सोपी बैठक आहे. तिला राजकीय रंग देण्याची गरज नाही. अंगणात जाऊन बैठक घेतोय. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत. मोठ्या संख्येने पदाधिकारी येत आहेत. अंगण कमी पडत आहे. वेगळा उत्साह शिवसेना परिवारात आहे, असं ते म्हणाले.

विजय आमचाच

पदवीधर निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरची तयारी करत आहोत. लढत आहोत. महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे. लोकसभा आणि विधानसभेत आमचाच विजय होईल. पण इतर निवडणुकीतही जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जोर लावत आहोत, असंही ते म्हणाले.

त्यांना बाद करा

विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे. संविधानाला पकडून आणि लोकशाहीला धरून निर्णय आला पाहिजे. एक तर निवडणुका जाहीर करा किंवा शिंदे गटाला बाद करायला हवं. तरच राज्यात लोकशाही जिवंत राहील, असं सांगतानाच ज्यांनी खोके घेतले त्यांच्या मनात काही तरी असेल. त्यांना देशातून लोकशाही संपवायची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.