पुणे | 7 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मराठी नाट्य संमेलनात मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी मराठी कलावंतांची हजेरी घेतली. तसेच त्यांनी आपल्याला निवडणूका लढविताना देखील लाज वाटते असे म्हटले आहे. कोणत्याही निवडणूकीच्या प्रचाराला जाताना तिच तिच आश्वासने राजकारणी देत असतात. आज 70 वर्षे झाली तरी त्याच त्याच विषयावर निवडणूका लढवाव्या लागत आहेत असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. माझे काकाही तेच म्हणायचे, आजोबाही तेच म्हणायचे, मी तेच म्हणतोय, सभेत गेल्यावर आजही तुम्हाला पाणी देईन, रस्ते देईन, लोडशेडींग दूर करेन अशीच आश्वासने मिळत आहेत असे राज ठाकरे म्हणाले.
गेली 70 वर्ष आपण त्याच-त्याच विषयांवर निवडणुका लढवतोय. आपण पुढे कधी जाणार आहोत. जर या परिस्थितीत कलावंत नसते, कवी नसते, शिल्पकार नसते, लेखक नसते, चित्रकार नसते, गायक हे सर्व लोक नसते तर या देशात कधीच अराजक आलं असतं असे राज ठाकरे यांनी सांगितले. पुढे म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था आज आपण पाहतो. तुम्हा कलाकारांमध्ये हे लोक गुंतून पडतात. तुमच्यावर प्रेम करतात. तुमच्यावर गुंतून पडले म्हणून बाकी गोष्टीवर दुर्लक्ष झाले. त्यामुळे मी नेहमी तुमचे आभार मानतो. ही मंडळी नसती तर या देशात काय झालं असतं. एकदा संध्याकाळच्या सीरिअल बंद करून बघा. काय आक्रोश होईल ? खऱ्या सासू -सुनांमध्ये भांडण लागेल अशीही मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.
तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याचं घेणं नाही. तुम्ही कोणत्या पक्षाला फॉलो करता घेणं नाही. पण मध्यमवर्गाने राजकारणात यावं. राजकारणा उडी घ्या. पुढाकार घ्या. सुशिक्षित असून चालणार नाही, सूज्ञ असावं लागतं. महाराष्ट्राला सूज्ञ लोकांची गरज आहे. महाराष्ट्र देशाला दिशा देतो. महाराष्ट्र विचार देतो. कोणतीही गोष्ट घ्या, महाराष्ट्रातील आहे. शिवाजी, फुले, आंबेडकर आणि टिळकही इथूनच गेले. पण तोच महाराष्ट्र चाचपडत असेल तर ही धोक्याची घंटा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
जातीपाती या फालतू गोष्टीत बरबटून जाऊ नका. उत्तर प्रदेश बिहारमध्ये काय झालं ते पाहा. आता ओबीसी मराठा हे सुरू आहे. हे कोणी तरी करत आहे, घडवत आहे. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून कोणी तरी करत आहे. जातीसाठी काही तरी करतोय असं वाटतंय पण तसं नाही. हे कोणी तरी करतंय. त्यासाठी काही चॅनल्स काम करत आहेत. सोशल मीडिया काम करत आहे. काही नेते पक्ष काम करत आहे. हे सर्व महाराष्ट्राचा एकसंघपणा विखरून टाकत आहेत. त्याचे हे प्रयत्न आहेत. पण आपले नेते मश्गूल आहेत सत्तेत. महाराष्ट्र म्हणून विचार करत नाहीत अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
मला बुलेट ट्रेनचं काही कळलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार काय करणार. ढोकळा खाणार आणि येणार. करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे आहे. मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे. मी काल सांगितलं ते आजही सांगेल. आपल्या इतिहासाला विसरू नका. ज्याला इतिहास म्हणतो तो भूगोलावर अवलंबुन आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं. तुम्ही सर्व युद्ध पाहिली. शिवाजी महाराजाांनी 28 किल्ले दिले. जमीन. म्हणजे भूगोल काबीज करण्यासाठी लढाया झाला त्याला इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घ्यायचे. आता चालाखीने घेतली जाते. ते तुम्हाला कळत नाही. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व आहे. तेच तुमच्या हातून गेले तर कोण तुम्ही ?.तुमची भाषा गेली. इतर भाषा आली तर कोण तुम्ही? आपण जातीपातीत मश्गूल झालो. स्वत:चं हरवून बसलो. सातव्या शतकात मराठी जन्माला आली. ती घालवून बसत आहे. आपली जमीन घालून बसत आहे. शिवडी – नाव्हा शेवा महामार्ग झाल्याने रायगड जिल्हा बरबाद होणार. आमचं लक्ष नाही. बाहेरची लोक येत आहेत. जमीन खरेदी करत आहे. आपला माणूस नोकर म्हणून राहील. नाही तर रायगड सोडावं लागेल. आज पुणे हाताला लागतं का. पुणे कुठपर्यंत पसरलं. कुणी पसरवलं. इथल्या लोकांनी लोकसंख्या पसरवली? का असाही सवाल त्यांनी केला.