लाडकी बहीण योजनेवरील नितीन गडकरींचं विधान चर्चेत, काय म्हणाले?

| Updated on: Sep 30, 2024 | 12:09 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विरोधाकांनीही त्यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत.

लाडकी बहीण योजनेवरील नितीन गडकरींचं विधान चर्चेत, काय म्हणाले?
नितीन गडकरी
Image Credit source: Facebook
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. सरकारच्या या योनजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र विरोधकांनी या योजनेवरून सरकारवर सातत्याने टीका केली आहे. दरम्यान आता भाजपाच्याच एका वरिष्ठ नेत्याने या योजनेवरून केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू झाली आहे.  ‘ उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते. कुठल्याही पक्षाची असली तरी ज्याच्या भरोशावर असते त्याला उध्वस्त करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे,’असे गडकरी म्हणाले.

‘विदर्भात मोठे गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून कोणी हाती लागत नसल्याची’ खंतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 500 हजार कोटीची गुंतवणूक करायला कोणी तयार नाही विदर्भात मिहान सारखे प्रकल्प आणले उद्योजक जमिनी विकत घेतात मात्र युनिट सुरू करत नाही,असे ते म्हणाले.

पैशांचा अपव्यय होतोय, केंद्राची काही जबाबदारी आहे का नाही? राऊतांचा सवाल

त्यांच्या या विधानानंतर आता विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेना ( उबाठा गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

‘ लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा सत्ताधारी गटात मारामारी सुरू आहे. पैसे मिळतात, त्या सर्व लाडक्या बहीणींचा डेटा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये ( योजनेतून)मुख्यमंत्री हा शब्दचं वगळला आहे. गडकरी जी जे म्हणत आहेत, ते बरोबर आहे. पण तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, जर अशा प्रकारे पैशांचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल. तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही ? ‘ असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

आमच्यापेक्षा गडकरींना आतली माहिती जास्त असणार – सुप्रिया सुळे

आमच्यापेक्षाा नितीन गडकरी यांना आतली माहिती जास्त असणार,असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असं सरकारमधील लोकंच बोलत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.