आम्हाला कुणाचेही पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही, राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत यांना टोला

| Updated on: Jul 03, 2024 | 11:09 AM

बीड लोकसभा निवडणुकीत धक्कादायकरित्या पराभव झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत तसेच परिणय फुके, योगेश टिळेकर आदींना विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे. यावर राजू शेट्टी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सदाभाऊंचे नाव घेता टिका केली आहे.

आम्हाला कुणाचेही पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही, राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत यांना टोला
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

वाशीम : राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपाने 5 जणाच्या नावांची घोषणा केली आहे. यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत आणि परिणय फुके यांची नावे सामील झाली आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी त्यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे भाजपा सरकारचे कौतूक केले आहे. त्यावर त्यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी काल सदाभाऊंचे नाव न घेता जहरी टीका केली आहे.

भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकात बीड मतदार संघातून पराभव झाला आहे. सदाभाऊ खोत यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल संदर्भात राजू शेट्टी यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंचे नाव न घेता आम्हाला कुणाचेही पाय चाटून उमेदवारी मिळवायची नाही अशी टीका केली आहे. ते सोमवारी वाशिममध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी

कोणाला उमेदवारी मिळते कुणाला नाही. याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आम्ही आमचं काम करत आहोत आणि आम्हाला कुणाचे पाय चाटून उमेदवारी घ्यायची नाही. आम्ही लढून जे काय असेल ते राजकारण करायचं, म्हणून कुठल्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणे स्वाभीमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. विधानसभेत जवळपास 30 ते 35 जागा लढवण्यासंदर्भात बारामतीच्या कार्यकारणीमध्ये चर्चा झालेली आहे. आणि लवकरच त्याची अंतिम यादी आम्ही जाहीर करणार आहोत असेही स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत.

किमान हमीभावाचा कायदा हवा

एमएसपी संदर्भात कायदा करावा म्हणून आम्ही देशभरात सगळीकडे आंदोलन करीत आहोत. दिल्लीला जे आंदोलन चालू आहे ते गॅरंटी कायद्यासाठी चालू आहे. जसा मजुरांच्यासाठी ‘किमान वेतन कायदा’ आहे तसा शेतकऱ्यांच्यासाठी देखील ‘किमान हमीभाव कायदा’ झाला तर सरकारने जाहीर केल्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणे गुन्हा ठरेल आणि तसा कायदा झाला तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळेल असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.