महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मविआचं जागा वाटप कधी होईल?; सुप्रिया सुळे यांचा अंदाज काय?

| Updated on: Sep 02, 2024 | 1:28 PM

आमचं सरकार हे त्यांच्या वजनानं पडेल असं देवेंद्र फडणवीस म्हणायचे. पण आमच्यात कॉम्प्लेक्स नव्हता. आम्हाला ईडी, सीबीआय वापरण्याची गरज नाही. या प्रश्नाचे मला उत्तर विचारण्यापेक्षा अजित पवार किंवा देवेंज्र फडणवीस यांना विचारा, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मविआचं जागा वाटप कधी होईल?; सुप्रिया सुळे यांचा अंदाज काय?
Follow us on

राज्यात कधीही विधानसभा निवडणुका लागू शकतात. त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागतात की नोव्हेंबरमध्ये? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे लक्ष लागलेलं असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात नोव्हेंबरमध्येच निवडणुका होणार असल्याचा अंदाज सुप्रिया सुळे यांनी वर्तवला आहे. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागून नोव्हेंबरमध्ये मतदान होईल आणि नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा अंदाज वर्तवला आहे. येत्या 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल. त्यानंतर 10 ते 12 नोव्हेंबरच्या आसपास राज्यात मतदान होईल. 15 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होऊन ही निवडणूक पार पडलेली असेल, असं सांगतानाच येत्या 8 ते 10 दिवसात निवडणूक आयोगाला या गोष्टी फायनल कराव्याच लागतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीचा निर्णय जितक्या लवकर होईल, तेवढा उमेदवारांना फायदाच होईल, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

येत्या दोन दिवसात मविआची जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसात जागा वाटपातून ठोस काही बाहेर पडेल. महाविकास आघाडीची कालही चर्चा झाली. आता बघा आज सप्टेंबर आला आहे. आमची 8-10 दिवसात चर्चा होईल. कारण त्यानंतर गणेशोत्वस आणि पितृपक्ष, तसेच दसरा आहे, असं सांगतानाच महायुतीने जागा वाटप कसं करावं? काय करावं ही त्यांची भूमिका आहे. ते मित्र पक्षाला कशी वागणूक देतात हे तुम्ही पाहिलं असेलच, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

आता क्राईम कॅपिटल

काल पुण्यात नगरसेवकाची हत्या झाली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेली दीडवर्ष दोन पुण्यात वारंवार कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. आता या शहराचा क्राईम कॅपिटल असा उल्लेख माध्यमात होत आहे. घटना दुर्दैवी आहे. गृहमंत्रालयाची आदरयुक्त भिती राहिलेली नाही. कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात प्रचंड अस्वस्थता

पुण्यात प्रचंड अस्वस्थता आहे. पुण्याला देशाचे शिक्षणाचे माहेरघर बोलले जायचे. पुण्याचा आम्हाला सार्थ अभिमान होता. देशातून मुले पुण्यात येतात. एका विश्वासच नात्याने शिकण्यास सुरुवात करतात. आज क्राईम कॅपिटल म्हणून पुण्याचा उल्लेख असलेल्या बातम्या येत आहेत. हे दुर्दैवी आहे. पूर्ण प्रशासन आणि राज्याचं गृहमंत्रालय कोलॅप्स झालं आहे. कोयता गँगची हिंमत वाढायला लागली आहे. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास राहिला नाही असं दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

बाकी काही आरोप करा

लोकशाही आहे. लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. मात्र भारतीय पक्षाने एक गोष्ट चांगली केली की, आमचे सगळे पक्ष हे भ्रष्टाचार मुक्त केले आहेत. त्यामुळे बाकी काही आरोप करा, पण भ्रष्टाचारातून आम्ही मुक्त झालोय. मग आम्ही घरी बसलो काय आणि बाहेर फिरलो काय काही आरोप करा हे भ्रष्टाचारापेक्षा चांगले आहे, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.