कोणत्या फॉर्म्युल्याने मराठा आरक्षण मिळणार?; फडणवीस यांच्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप काय?

| Updated on: Nov 25, 2023 | 1:00 PM

सर्वच पक्षांमध्ये बेजबाबदार वक्तव्य होतात ही वस्तुस्थिती आहे. आता कोणत्या पक्षात किती वाचाळवीर आहेत यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. आपण जे बोलतो ते समाजातील सर्वजण ऐकत असतात. त्यामुळे इतर घटकांवर त्याचा परिणाम होत असतो, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आलेले नाहीत याविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला. प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो, असं चव्हाण म्हणाले.

कोणत्या फॉर्म्युल्याने मराठा आरक्षण मिळणार?; फडणवीस यांच्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप काय?
Follow us on

भूषण पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 25 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेगाने प्रक्रिया सुरू केली आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ही शंका व्यक्त केली जात असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी जुलै 2014मध्ये मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिलं होतं. नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिलं त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचं नाही. स्वातंत्र्यानंतर या आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी हा प्रश्न हाताळला होता. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला होता. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. यामध्ये मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून 2014 मध्ये 16 टक्के आरक्षण दिले आणि मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा 50 जाती शोधून 5 टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते, असं सांगतानाच आमचं सरकार पाडण्यात आलं आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

फडणवीसांकडून फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत 16 टक्केच्या ऐवजी 12 टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र ती निव्वळ फसवणूक होती, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, असं ते म्हणाले.

रोज आत्मक्लेश करा

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण करून राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली होती. त्याचा अभ्यास इतर राज्यांकडून केला जायचा. मात्र दुर्दैवाने हे चित्र आता राहिले नाही. नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर येऊन एकदा आत्मक्लेश करू नये. तर रोज सकाळ-संध्याकाळी येऊन आत्मक्लेश करावा, असं त्यांनी सांगितलं.

भाजपकडून प्रोत्साहन

आयाराम गयाराम संस्कृती थांबवण्यासाठी राजीव गांधींनी पक्षांतर बंदी कायदा आणला होता. मात्र 2003मध्ये त्यात जे बदल झाले त्यामुळे हा कायदा कुचकामी ठरला. आता घोडेबाजाराला ऊत आला आहे. या घोडेबाराचा अनिष्ट परिणाम प्रशासनावर आणि राजकारणावर झाला आहे. असं वागणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आता जनतेची आहे. सर्वात महत्त्वाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. मोदींनी मान्यता दिली नसती महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नसता नसता, असा आरोप करतानाच काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण सत्ता पाहिजे या सूत्रावर देश चालला आहे हे दुर्देव आहे. या घोडेबाजाला भाजपकडून उघड प्रोत्साहन दिलं जातंय. पण जनता आता बदलासाठी तयार आहे, असंही ते म्हणाले.

त्यांच्यात हिंमत नाही

सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येत नाही. त्यांच्यात तेवढं धाडस उरलेलं नाही. निवडणुका घेतल्या नाही तर आरक्षणाला अर्थ नाही, असं ते म्हणाले. धनगर समाजाला 15 दिवसात आरक्षण देतो असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असा चिमटाही त्यांनी काढला.