भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर गोळीबार, 4 हल्लेखोर अटकेत, कोण आहेत हल्लेखोर?

| Updated on: Jul 01, 2023 | 7:17 PM

सहारनपूर येथील देवबंदमध्ये भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर 28 जून रोजी जीवघेणा हल्ला झाला. चंद्रशेखर आझाद यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले होते.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर गोळीबार, 4 हल्लेखोर अटकेत, कोण आहेत हल्लेखोर?
BHIM ARMY CHIEF CHANDRASHEKHAR AZAD
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्यात आझाद गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोरांची कार जप्त केली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा अधिक वेगाने तपास सुरु केला. अखेर, चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना पोलिसांनी अंबाला येथून अटक केली आहे. हे हल्लेखोर अंबाला न्यायालयात आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे. यातील तीन हल्लेखोर रणखंडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

सहारनपूर पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा चार शूटर हरियाणा सीमेवर घुसले आहेत आणि ते यमुनानगरमार्गे अंबाला येथे पोहोचले होते अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असता त्यांना अग्रवाल ढाब्यावर चार जण संशयास्पद रीतीने फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी आझाद यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

जेलरवरही केला होता हल्ला

सहारनपूर पोलिसांनी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रशांत, विकास आणि लविश अशी अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांची नावे असून ते यूपीमधील आहेत. तर, चौथा आरोपी विकास गोंदर निसिंग हा हरियाणाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेदरम्यान त्यांच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नाही असेही सांगण्यात आले आहे. यापैकी एक जण 15 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला असून त्याने तेथील जेलरवरही हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

कसा झाला होता हल्ला?

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उपचार करून 29 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. या हल्ल्याची कहाणी सांगताना त्यांनी दिल्लीहून परत येत असताना हा हल्ला झाल्याचे सांगितले. देवबंदमध्ये हल्ला झाला तेव्हा माझ्या कारमध्ये फोनवर होतो. अचानक एक गोळी वाजली आणि काचेवर आदळली. यामुळे काच फुटली. 20 सेकंदात 3 ते 4 गोळ्या झाडल्या गेल्या. ज्या वाहनातून गोळीबार झाला ते वाहन माझ्या मागे येत होते अशा घटनाक्रम त्यांनी सांगितला होता.

हल्लेखोर कोण आहेत?

कोणाला मला मारायचे आहे. माझ्या मृत्यूचा फायदा कोणाला आहे हे जाणून घेण्याची मलाही उत्सुकता आहे, असे आझाद म्हणाले होते. ज्या ठिकाणी गाडी जप्त करण्यात आली ते गुर्जर समाजाचे गाव आहे. दलित आणि गुर्जर यांच्यात संघर्ष निर्माण करण्यासाठीच हा हल्ला कऱण्यात आला होता का असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. माझ्यावर अनेक केसेस आहेत. मी तुरुंगातही गेलो आहे. त्यामुळे मला फक्त गोळीची भीती वाटत होती. ती गोळी माझ्यावर चालली होती असेही ते म्हणाले होते.