‘त्या’ वक्तव्याशी आमचा संबध नाही, भाजपने कंगनाला झापलं; सोशल मीडियावरच सुनावलं

| Updated on: Aug 26, 2024 | 4:49 PM

"भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे", असं भाजपने अधिकृतपणे पत्र जाहीर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

त्या वक्तव्याशी आमचा संबध नाही, भाजपने कंगनाला झापलं; सोशल मीडियावरच सुनावलं
भाजपने कंगनाला झापलं; सोशल मीडियावरच सुनावलं
Follow us on

भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षाने घरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत. विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत भूमिका मांडली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका जाहीर केली आहे.

भाजपने काय म्हटलं आहे?

“भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे. पक्षाच्या वतीने, कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही”, असं भाजपने म्हटलं आहे.

“भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार आहे”, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.

काय म्हटलं होतं कंगना राणावत?

“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं.

“शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असं कंगनाने म्हटलं आहे.