हिंदू राजाच्या जागेवर बांधला शहाजहानने ताजमहल, काय होते ताजमहलचे खरे नाव?

| Updated on: Jul 10, 2024 | 5:12 PM

तापी नदीच्या जमिनीची पाहणी केल्यानंतर कारागिरांनी तेथे इमारत बांधण्यास नकार दिला. कारागिरांनी नकार दिल्यानंतर शहाजहान आग्र्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याची नजर यमुनानदी असलेल्या एका राजवाड्यावर गेली. त्या जमिनीची मूळ मालकी कुणाकडे होती? ताजमहल याचे खरे नाव काय होते? इतिहास काय सांगतो?

हिंदू राजाच्या जागेवर बांधला शहाजहानने ताजमहल, काय होते ताजमहलचे खरे नाव?
TAJMAHAL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात बांधलेला ताजमहल ही एक जागतिक वारसा समाधी आहे. प्रत्येक भारतीयासोबत जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना ताजमहालचे विशेष आकर्षण असते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही ताजमहलचे नाव समाविष्ट आहे. मुघल सम्राट शाहजहान याने पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ 17 व्या शतकात हा महल बांधला. या इमारतीत 28 विविध प्रकारचे दगड वापरण्यात आले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली ताजमहल बांधण्यासाठी 20,000 हून अधिक मजुरांनी रात्रंदिवस काम केले. त्यावेळी हा महल तयार करण्यासाठी 3.2 कोटी रुपये खर्च केले होते. एवढेच नाही तर ताजमहल बनवण्यासाठी सुमारे 22 वर्ष लागली होती. पण, शाहजहान याने ताजमहल बांधलेल्या जमिनीची मूळ मालकी कुणाकडे होती? त्याचप्रमाणे ताजमहल याचे खरे नाव काय होते? इतिहास काय सांगतो?

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार इ. स. 1631 मध्ये शहाजहान प्रिय पत्नी मुमताज महल हिच्यासह बुऱ्हाणपूरला आला होता. बुऱ्हाणपूरला त्याची ती दुसरी भेट होती. मुमताज त्यावेळी गरोदर होती. 17 जून 1631 रोजी तिने अपत्यास जन्म दिला. पण, स्वतः अखेरचा श्वास घेतला. मुमुताज हिच्यावर दुसऱ्या दिवशी जैनाबादच्या आहुखान्यातील (शिकारीचे ठिकाण) बागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुमताज हिचे पार्थिव जेथे ठेवण्यात आले होते त्या जागेच्या चारही भिंतींमध्ये आतून दिवे लावण्यासाठी कोनाडे बसवले गेले. सतत 40 दिवस तिथे दिवे पेटविण्यात येत होते.

एके दिवशी शहाजहान याने मुमताजच्या त्या थडग्यावर हात ठेवून ‘तुझ्या स्मरणार्थ अशी इमारत बांधेन की ज्याची जगात त्याची बरोबरी होणार नाही!’ अशी शपथ घेतली. मुमताजच्या स्मरणार्थ तापी नदीच्या काठावर अशी भव्य वास्तू बांधण्याची त्याची इच्छा होती. परंतु, तापी नदीच्या जमिनीची पाहणी केल्यानंतर कारागिरांनी तेथे इमारत बांधण्यास नकार दिला.

कारागिरांनी नकार दिल्यानंतर शहाजहान आग्र्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याची नजर यमुनानदी असलेल्या एका राजवाड्यावर गेली. हा राजवाडा राजा मानसिंग यांचा होता. राजा मानसिंग हे जयपूरचे सरंजामदार होते. सम्राट अकबर यांच्या दरबारात त्यांना मोठा मान होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नातू मिर्झाराजा जयसिंग यांच्याकडे त्या राजवाड्याची मालकी आली होती. मिर्झाराजा जयसिंग तेच ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पारिपत्य करण्यासाठी औरंगजेबाने दक्षिणेत पाठविले होते.

शाहजहान याने घेतलेला तो परिसर आग्रामध्ये ‘जयपूर हाऊस’ म्हणून ओळखला जात होता. शाहजहानने मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडून तो राजवाडा मुमताजची कबर बांधण्यासाठी घेतला. त्याबदल्यात शाहजहान याने जयसिंग यांना चार हवेल्या दिल्या. आग्रा येथे ताजमहाल बनवण्यासाठी इ. स. 1631 मध्ये बांधकाम सुरू झाले आणि इ. स. 1653 मध्ये पूर्ण झाले.

आग्रा येथे ताजमहाल बनला असला तरी मुमताज महल हिच्या मृत्यूनंतर तिचा देह सहा महिने जैनाबादच्या आहुखान्यातील (शिकारीचे ठिकाण) बागेतच होता. तिचे अवशेष नंतर आग्रा येथे नेण्यात आले. मुमताजला कबरीत दफन केले तेव्हा सम्राट शाहजहानने पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या या सुंदर इमारतीचे नाव ‘रौजा-ए-मुनव्वरा’ ठेवले होते. मात्र, काही काळानंतर त्याचे नाव बदलून ताजमहल करण्यात आले. ताजमहल आग्र्याच्या सुमारे 60 बिघा परिसरात पसरला आहे.