चिखल, राडा, पायांचे ठसे, चपलांचा खच … हाथरसमधील भीषण दृष्याने डोळे पाणावतील ! भोले बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू

| Updated on: Jul 03, 2024 | 8:48 AM

उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये 2 जुलैला एका धार्मिक तल्लीन झालेल्या भाविकांमध्ये अचानक धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरी होऊन 116 लोकांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले. गेल्या कित्येक वर्षातील ही अतिशय भयानक दुर्दैवी घटना आहे.

चिखल, राडा, पायांचे ठसे, चपलांचा खच ... हाथरसमधील भीषण दृष्याने डोळे पाणावतील ! भोले बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू
Follow us on

उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये 2 जुलैला एका धार्मिक तल्लीन झालेल्या भाविकांमध्ये अचानक धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरी होऊन 116 लोकांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले. गेल्या कित्येक वर्षातील ही अतिशय भयानक दुर्दैवी घटना आहे. या सत्संगाचे आयोजन ‘भोले बाबा’ उर्फ ​​बाबा नारायण हरी उर्फ ​​साकार विश्व हरी यांच्या संस्थेने केले होते. मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेनंतर सत्संग जिथे झाला आणि चेंगराचेंगरी झाली तिथे मृतदेहांचा अक्षरश: खच पडला होता. घटनास्थळावरचे दृश्य पाहून डोळ्यातील अश्रूही थिजतील अशी भयानक परिस्थिती होती.

सत्संग आटोपल्यानंतर भोले बाबा गाडीत बसून निघाले असता, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी अनुयायांचा जमाव त्यांच्या मागे धावला. बाबांचा पाय जिथे पडेल तेथील माती उचलण्याची अनुयायांमध्य जणू स्पर्धाच लागली होती. रस्त्याच्या पलीकडे पाच ते सहा फूटावरच मोठा खड्डा होता. मागून लोकांचा जमाव अंगावर आल्याने समोरचे लोक दबावामुळे खड्ड्याच्या दिशेने पडू लागले. आणखी लोक येतच राहिले आणि एकमेकांच्या अगांवर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

पाण्यात-चिखलात एकमेकांवर आदळले लोक

रस्त्याच्या खाली पाणी आणि चिखलाने भरलेली शेतं होती. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले लोक निसरड्या जमीनीमुळे पाण्यात आणि चिखलात पडले आणि गाडले गेले. बहुतांश लोकांचा मृत्यू हा गुदमरल्याने आणि चिरडल्याने झाला आहे. लोकांच्या पायाचे ठसे, महिला व लहान मुलांच्या चपला शेतात विखुरल्या होत्या. सत्संगाला 80 हजार लोक उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे, मात्र खरा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्याची माहिती असतानाही आयोजकांनी घटनास्थळी रुग्णवाहिका व अन्य व्यवस्था केली नाही. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बचावकार्यास वेळ लागला आणि मृतांचा आकडा वाढला.

या दुर्घनेनंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. मात्र इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अद्याप पटलेली नव्हती. तिथेच पडलेल्या मृतदेहांच्या ढिगात जमलेल्या नातेवाईकांकडून आपल्या आप्तांचा शोध सुरू होता. तर आपल्या जवळच्यांना गमावलेल्या लोकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत होता.

 

स्वयंसेवक ठेवत होते गर्दीवर नियंत्रण

या कार्यक्रमातील गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही बाबांच्या स्वयंसेवकांनी घेतली होती. भोले बाबांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी लोकं त्यांच्या मागे धावत असताना स्वयंसेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडून मंजुरी घेण्यात आली होती, परंतु गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नाही. कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याासाठी आणि बाहेर पडण्यासाठी कोणतेही विशिष्ट गेट नव्हते. तसेच बॅरिकेडिंगद्वारे वेगळ्या लाइन्सही आखण्यात आलेल्या नव्हत्या, अन्यथा त्यामुळे गर्दीचे विभाजन होऊन होणारी चेंगराचेंगरीची परिस्थिती टाळता येऊ शकली असती.

दुर्घटनेनंतर भोले बाबा फरार

ज्या बाबांच्या सत्संगामध्ये ही दुर्घटना झाली ते भोले बाबा या घटनेनंतर फरार झाले असून त्यांच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी त्याच्या मैनपुरी येथील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमात शोधमोहीम राबवली, मात्र भोले बाबा काही तेथे सापडले नाहीत. या दुर्दैवी घटनेनंतर भोले बाबा मैनपुरीतील बिचवान येथील त्यांच्या राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्ट आश्रमात पोहोचले. संध्याकाळपर्यं यूपी पोलिस ‘भोले बाबा’च्या शोधात मैनपुरी आश्रमात पोहोचले आणि राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली. मात्र भोले बाबा आश्रमात सापडले नाहीत. त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या सांगण्यानुसार, या’सत्संग’ दरम्यान चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या 116 लोकांपैकी बहुतांश लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज हातरस येथे येऊन अपघातस्थळाला भेट देणार आहेत.