छत्तीसगडचा भाजपने असा केला काबीज किल्ला, काँग्रेसच्या पराभवाची आहेत ही कारणे

| Updated on: Dec 03, 2023 | 9:23 PM

Assembly Election 2023 | सर्वात धक्कादायक छत्तीसगडचे कल ठरले आहेत. भाजपने मोठी मुसंडी मारली. छत्तीसगड काँग्रेसच्या हातून जाईल हे काँग्रेसला वाटलेच नाही. पण भाजपने मोठा झटका दिला. भूपेश बघेल यांची खूर्ची भाजपने ओढली. भाजपच्या आघाडीने अनेक राजकीय विश्लेषकांना पण बुचकाळ्यात टाकले आहे. एक्झिट पोलचे अंदाज तर पार धुळीस मिळाले.

छत्तीसगडचा भाजपने असा केला काबीज किल्ला, काँग्रेसच्या पराभवाची आहेत ही कारणे
Follow us on

रायपूर | 3 डिसेंबर 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. खुद्द काँग्रेसला पण या उलटफेरची शक्यता वाटली नसेल. छत्तीसगड असे झरकन हातून काढून घेण्यात येईल, याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. एक्झिट पोलमध्ये भूपेश बघेल यांना कौल दिला होता. पण जे कल आले आहेत. काही ठिकाणच्या विजयाने भाजपने सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले. भाजपने जी अनपेक्षित मुसंडी मारली. त्यामुळे राजकीय विश्लेषकांना पण बुचकाळ्यात टाकले. भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. या पराभवाचे खापर कुणावर तरी फुटणारच आहे. पण काँग्रेसच्या चुका आणि त्याचा फायदा भाजपने कसा घेतला हे पाहणे पण तितकेच औत्सुक्याचे आहे.

ओबीसीची मोट बांधण्यात फेल

मुख्यमंत्री भूपेश बघेल हे ओबीसीचा मोठा चेहरा मानण्यात येतो. पण याच कल्पनेला भाजपने पहिला छेद दिला. ओबीसीची मोट बांधण्यात काँग्रेसला अपयश आले. भाजपने याच मुद्यावर बघेल यांना आपटी दिली. साहू समाजाचे मोठे मतदान यावेळी काँग्रेसच्या पारड्यात पडले नाही. 2018 मध्ये हा समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा ठाकला होता. भाजपने गावापर्यंत प्रचाराचा रथ नेला. केंद्र सरकारच्या योजनांची उजळणी केली. ओबीसी समीकरण जुळवले.

हे सुद्धा वाचा

गल्लीपर्यंत भाजप

2018 मध्ये भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिली होती. त्यातून भाजपने धडा घेतला. संघटनेवर अधिक लक्ष दिले. बुथ पातळीवर मोठे काम केले. काँग्रेस पुन्हा सत्ता येणार या स्वप्नात रमली. काँग्रेस बुथ स्तरावर कमकुवत झाल्याचा राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे. त्याचा फायदा भाजपने घेतला. संघटनात्मक दृष्ट्या भाजप गल्लीपर्यंत पोहचली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावती प्रचार

मध्यप्रदेश, राजस्थान प्रमाणेच भाजपने येथे पण पक्षातील दिग्गजांना प्रचारात उतरवले. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, विजय बघेलपासून अनेक मोठ्या चेहऱ्यांनी हुंकार भरला. कार्यकर्त्यांना बळ दिले. भाजपने कोणालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावती प्रचार केला तर बुथवर पण अधिक मेहनत घेतली. भाजपची ही कवायत कामी आली.

सोशल इंजिनिअरिंग पथ्यावर

ओबीसीसह भाजपने इतर जातींची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला ओबीसीसह इतर जातींचे समीकरण जुळवता आले नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेचे मतदार ग्रामीण भागात होते. काँग्रेस त्याच आधारावर सत्तेत येण्याची वाट पाहत होती. पण शेतकरी आणि ओबीसी यांच्यासह आदिवासी समाजाची साथ मिळाल्याने भाजपचा विजयाचा प्रवास सुखकर झाला.

आदिवासी चेहरा देणार?

भाजपने इतर राज्यांप्रमाणे याठिकाणी पण मुख्यमंत्री चेहरा घोषीत केला नाही. आता भाजप छत्तीसगडमध्ये आदिवासी चेहरा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपने हे कार्ड अगोदर खेळले आहे. छत्तीसगडमध्ये असा प्रयोग केल्यास कदाचित लोकसभेच्या निवडणुकीत या भागातील आदिवासी भरघोस मिळण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला

भाजपने भूपेश बघेल सरकारला अनेक मुद्यांवर घेरले. पण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर या सरकारला जेरीस आणण्यात भाजपला यश आले. PSC घोटाळा, महादेव एपच्या मुद्यावर भाजपने बघेल सरकारची परीक्षा घेतली. पण या पेपरमध्ये त्यांना फेल करण्यात भाजप यशस्वी ठरले. भ्रष्टाचार हा प्रचारातील मुख्य विषय होता.