Indian Railway : तुम्ही तर करत नाही ना ही चूक? Train मध्ये या वस्तू अजिबात नेऊ नका

| Updated on: Aug 26, 2023 | 3:26 PM

Indian Railway : तामिळनाडू येथील मदुराई रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनला आग लागली. त्यात 10 लोकांचा मृत्यू झाला. तर 20 प्रवाशी जखमी झाले. प्रायव्हेट पार्टी कोचमध्ये अवैधरित्या सिलेंडर घेऊन जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रेल्वे प्रवासात चुकून पण हे सामान घेऊन जाऊ नका.

Indian Railway : तुम्ही तर करत नाही ना ही चूक? Train मध्ये या वस्तू अजिबात नेऊ नका
Follow us on

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : तामिळनाडू मधील मदुराई रेल्वे स्टेशनजवळ (Madurai Railway Station in Tamil Nadu) रेल्वेला आग लागली. मीडिया रिपोर्टसनुसार शनिवारी ही दुर्घटना समोर आली. एका कोचमध्ये आग लागल्याने त्यातील 10 लोकांचा मृत्यू ओढावला तर 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले. आगीमुळे अनेकांचा हा शेवटचा प्रवास ठरला. तर काही जण मृत्यूशी कडवी झुंज देत आहेत. रिपोर्टनुसार, प्रायव्हेट पार्टी कोचमध्ये अवैधरित्या सिलेंडर (Gas Cylinder) नेण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. अवैधरित्या काही माणसे चहा तयार करण्यासाठी सिलेंडरचा वापर करत होते. त्यामुळे या कोचमध्ये आग भडकली. रेल्वेतून प्रवास करताना तुमचा मनमानी कारभार चालत नाही. तुम्ही कोणतेही ज्वलनशील अथवा धोकादायक वस्तू रेल्वे प्रवासात सोबत घेऊन जाऊ शकत नाही. याप्रकरणी जीवात धोका निर्माण केल्याप्रकरणी रेल्वे प्रशासन तुम्हाला दंडासहित तुरुंगवारी (Penalty with Jail) पण घडवू शकते.

या वस्तूंना नो एंट्री

ट्रेनमध्ये गॅस सिलेंडर, स्टोव्ह, फटाके, आम्ल पदार्थ, दर्प असणारे पदार्थ, चामडे, ग्रीस अथवा ज्वलनशील रसायन हे सोबत नेता येत नाही. असे कोणतेही सामान ज्यामुळे सह प्रवाशांना त्रास होईल, त्यांचे नुकसान होईल, त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल, ते सोबत नेता येत नाहीत. रिपोर्टनुसार, तुप पण केवळ 20 किलोच नेता येते. ते पण चांगले पॅक केलेले असावे, असा नियम आहे.

हे सुद्धा वाचा

तर तुरंगवास

रेल्वेतून प्रवास करताना प्रतिबंधित वस्तू, सामान सोबत बाळगणे, नेणे, याविषयी सक्त मनाई आहे. जर एखाद्या प्रवाशाने प्रतिबंध असलेल्या वस्तू सोबत ठेवल्यास त्याला तुरुंगवारी होऊ शकते. रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत ही कारवाई करण्यात येते. दंडासहित अशा प्रवाशांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.

या गोष्टींचे पण ठेवा भान

ट्रेनच्या प्रवासादरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून अनेकदा प्रवाशी फोनवर गप्पा झोडतात. ही बाब पण धोकादायक असते. ट्रेनमधून उतरताना अथवा चढताना मोबाईलवर बोलणे टाळणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेत चढताना तुमची बँग बाहेर लटकणार नाही याची काळजी घ्या. धावत्या ट्रेनमध्ये चढणे तर सर्वात धोकादायक आहे. तुमच्या रेल्वेच्या वेळापूर्वी तुम्ही स्टेशनवर हजर राहणे सर्वात चांगले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची धावपळ उडत नाही. तसेच जीव धोक्यात येत नाही. सामान विसरण्याचा, नुकसानीचा कमी त्रास होतो.