“मोदींच्या सन्मान सोहळ्याला पवार गैरहजर राहिले असते तर, त्यांच्या नेतृत्वाला सह्याद्रीने दाद दिली असती”

| Updated on: Aug 01, 2023 | 8:10 AM

Saamana Editorial on Sharad Pawar : शरद पवार यांच्या कृतीवर ठाकरे गटाचा आक्षेप; सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत म्हणाले, तुमच्याकडून लोकांना वेगळ्या अपेक्षा...

मोदींच्या सन्मान सोहळ्याला पवार गैरहजर राहिले असते तर, त्यांच्या नेतृत्वाला सह्याद्रीने दाद दिली असती
Follow us on

मुंबई | 01 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावर सामनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

सामना अग्रलेखातील मजकूर जसाच्या तसा

महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही.

खरे तर लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. आता शरद पवारांचे म्हणणे असे की, तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल; पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती.

लोकमान्यांनी सांगितले आहे, ‘समाजाचा पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा आणि स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी लागत असते.” ते आज आठवते. श्री. शरद पवार हे ‘मऱ्हाटे’ आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात. तेव्हा त्यांच्याकडून वेगळय़ाच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे.

देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय व त्या लढय़ासाठी ‘इंडिया’ ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. श्री. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत. मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकूमशाही वृत्तीचे विधेयक आणणारे श्री. मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील व श्री. शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.

देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी श्री. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि अराजकावर काहीच बोलायला तयार नाहीत. मणिपुरात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान मौनात आहेत.

देशाच्या नायकाने संकटकाळी मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे.

नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी, गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन!