लालकिल्ल्यावरून भारतीयांना कामचुकार, आळशी म्हटलं गेलं; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

| Updated on: Feb 26, 2024 | 10:43 PM

TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवत काँग्रेसवर हल्ला चढवलेला पाहायला मिळाला.

लालकिल्ल्यावरून भारतीयांना कामचुकार, आळशी म्हटलं गेलं; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
Follow us on

नवी दिल्ली :  टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमातील भाषणाला सुरूवात कली.  नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या काळात झालेल्या कामांची यादी वाचून दाखवली. त्यासोबतच मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला.

लालकिल्ल्यावरून सांगितलं जायचं भारतीय निराशावादी आहे. पराजय भावनेला स्वीकारणारे आहोत. लालकिल्ल्यावरून भारतीयांना आळशी संबोधलं गेलं. कामचुकार म्हटलं गेलं. जेव्हा देशाचं नेतृत्वच नैराश्याने भरलेलं असेल तर देशात आशेचा संचार कसा होईल? त्यासाठी देशातील लोकांनीही ठरवलं होतं, आता देश असाच चालेल. त्यात भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाचं कंबर तोडल्याचं म्हणत काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं आहे. केवळ दहा वर्षात भारत जगाची टॉप फाईव्ह अर्थव्यवस्थेत आला आहे. आज देशात गरजेची धोरणं वेगाने होतात आणि निर्णय त्याच वेगाने घेतले जातात. माइंडसेटच्या बदलाने हे घडवून आणले. २१ व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान,  आज भारताचा विकास पाहून जग हैराण आहे. भारतासोबत चालताना जग स्वतचा फायदा पाहत आहे. भारतात हे झालंय, भारताने हे केलंय, अशा रिअॅक्शन येत आहे. या रिअॅक्शन आजच्या जगाचं न्यूनॉर्मल आहे. वाढती विश्वासहार्य आज भारताची ओळख आहे. दहा वर्षापूर्वीचे आणि आजचे एफडीआयचे आकडे पाहा. मागच्या सरकारमध्ये दहा वर्षात ३०० मिलियनची एफडीआय भारतात आली. आमच्या सरकारच्या १० वर्षात ६४० मिलियन एफडीआय भारतात आली. दहा वर्षात जी डिजीटल क्रांती आली, भारताच्या लोकांचा सरकारवर विश्वास बसत आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.