फोटो कितीही चांगला काढला तरी, जनतेचं मन जिंकू शकत नाही, पंतप्रधानांचा कोणाला खणखणीत इशारा

| Updated on: Dec 03, 2023 | 8:19 PM

Assembly Election 2023 | विजयाचे विश्लेषण करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे विरोधकांवर टीका केली. आता तरी सुधरा, असा टोला ही त्यांनी या विजयाच्या निमित्ताने विरोधकांना लगावला. त्यांनी देशातील विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर आसूड उगारला. त्यांनी खास शैलीत त्यांना चिमटे पण काढले. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

फोटो कितीही चांगला काढला तरी, जनतेचं मन जिंकू शकत नाही, पंतप्रधानांचा कोणाला खणखणीत इशारा
Follow us on

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : भाजपने काँग्रेसची दोन राज्यं खेचून आणत लोकसभेच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. भाजपने न भूतो, न भविष्यती अशी कामगिरी केली. सर्व एक्झिट पोल विरोधात असताना, काँग्रेसने बळ लावलेले असतानाही त्यांच्या हातातून सत्तेचा सोपान आपल्या हाती घेतला. नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात या विजयाचे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर विश्लेषण केले. या विजयाच्या निमित्ताने त्यांनी अनेक गौप्यस्फोट तर केलेच. पण विरोधकांना त्यांच्या चुका पण निदर्शनास आणून दिल्या. अपेक्षेप्रमाणे त्यांनी विरोधकांवर आसूड उगारला. त्यांनी विरोधकांना चिमटेच काढले नाही तर त्यांचे कान पण टोचले. सध्या विरोधकांनी सरकारविरोधात जी आरोपांची राळ उडवली, त्याचा पण त्यांनी खरमरीत समाचार घेतला. त्यांच्या भाषणांनी सभेत खसखस पिकली तर विरोधकांवरील टीकेच्यावेळी मोदी मोदीच्या नाऱ्यांनी आसमंत दुमदुमला.

भाजपच्या विजयाचे रहस्य तरी काय?

जिंकण्यासाठी हवेतल्या गप्पा मारणं आणि लोकांना लालच दाखवणं हे मतदार स्वीकारत नाही. मतदारांना त्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप हवा असतो. विश्वास हवा असतो. भारताचा मतदार हे जाणून असल्याचे ते म्हणाले. भारत पुढे जातो तेव्हा राज्य पुढे जातं. प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान उंचावतं. त्यामुळेच तो भाजपला निवडून देत आहे. वारंवार निवडून देत आहे, हे भाजपच्या विजयाचे रहस्य असल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ही २०२४ च्या हॅट्रिकची गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच देशाच्या केंद्रस्थानी येईल, हे ठासून सांगितले. त्यांनी सूतोवाच नाही तर विश्वासपूर्वक भाजप सत्तेत येणार असल्याचे अधोरेखीत केले. काही लोक म्हणतात, आजच्या या हॅट्रीकने २०२४च्या हॅट्रीकची गॅरंटी दिली आहे. आजच्या जनादेशाने हे सुद्धा सिद्ध केलंय की, भ्रष्टाचार, लांगूलचालन आणि घराणेशाही बाबत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात झिरो टॉलरन्स बनत आहे. देशाला वाटतं या तीन वाईट गोष्टी संपवण्यास केवळ भाजपच प्रभावी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचारविरोधातील लढाईला पाठिंबा

केंद्र सरकारने देशात भ्रष्टाचाराविरोधात मोहिम उघडली आहे. जे लोक, नेते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यांचे समर्थन करत आहे, त्यांना या विजयाने मतदारांनी थेट इशारा दिल्याचे ते म्हणाले. काही लोक भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देतात, असे लोक भ्रष्टाचाऱ्यांवर प्रहार करणाऱ्या चौकशी यंत्रणांना बदनाम करत आहे. हे निकाल भ्रष्टाचाराविरोधातील लढाईचं समर्थन आहे, असे ते म्हणाले.

फोटो कितीही चांगला…

हे निकाल काँग्रेस आणि अहंकारी आघाडीला मोठा इशारा असल्याचे ते म्हणाले. काही कुटुंब एकत्र आले आणि फोटो कितीही चांगला काढला तरी ते जनतेचं मन जिंकू शकत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना लगावला. या अहंकारी आघाडीच्या मनात राष्ट्र सेवेचा भाव अजिबात दिसत नाही. शिव्या, निराशा आणि नकारात्मकता या गोष्टी अहंकारी आघाडीला मीडियाची हेडलाईन देईल. पण त्यांना लोकांच्या हृदयात स्थान देणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आता तरी सुधरा, मोदींचा विरोधकांना इशारा

आता तरी सुधरा नाही तर जनता तुम्हाला साफ करेल, हाच या निवडणूक निकालातून जनतेने इशारा दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसला सल्ला आहे, देशात फूट पाडणाऱ्या शक्तीला बळ देऊ नका. अशा लोकांसोबत राहू नका. देशाच्या विकासाच्या आड येऊ नका, असे कान त्यांनी टोचले.