टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176-7 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची दमदार अर्धशकी खेळी केली. टीम इंडियासाठी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा होता.
रोहित शर्माचा फंलदाजी करण्याचा निर्णय आफ्रिका संघाने चुकीचा ठरवला होता. रोहित शर्मा आणि पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. सुर्यकुमारही लवकर माघारी परतला, त्यानंतर एक असा खेळाडू ज्याच्याकडे अनेकदा जास्त लक्ष जात नाही.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. इंग्लंडविरूद्ध केलेल्या कमाल गोलंदाजीनंतर सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. आता फायनल सामन्यातही अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला वरती फलंदाजीसाठी पाठवलं.
टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. कोहली धावांसाठी संघर्ष करत होता त्यावेळी अक्षर मोठे फटके खेळून दबाव कमी करण्याचं काम करत होता.
अक्षर पटेल याने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेल रन आऊट झाला नाहीतर टीम इंडियाच्या टोटलमध्ये आणखी धावांची भर नक्कीच पडली असती. त्यामुळे फायनल जिंकण्यात अक्षरचाही सिंहाच वाटा आहे.