ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाच्या बाजूने मोठा निकाल आला आहे. 31 वर्षानंतर न्यायालयाने व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. 1993 पासून या तळघरात पूजा करण्यास बंदी घालण्यात आली होती.
ज्ञानवापीच्या दिशेने मुख करून असलेल्या नंदीच्या समोर दक्षिण भिंतीजवळ तळघरात 1551 पासून व्यास पीठ स्थापित आहे. या व्यास पीठात शृंगार गौरीची पूजा, भोग आणि आरती होत होती.
तत्कालीन राज्य सरकारच्या म्हणजेच मुलायम सिंह यांच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली होती.1993 मध्ये तोंडी आदेश देत पूजा पाठ आणि परंपरा बंद करण्यात आल्या. तसेच परिसराच्या चारही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आलं.
डिसेंबर 1993 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी व्यास पीठाच्या तत्कालीन पुजारी पंडित सोमनाथ व्यास यांच्या प्रवेशावर बंदी घातली. तसेच पूजा पाठ करण्यास मज्जाव केला. तळघरालाही टाळं ठोकलं.
तळघरात पूजा करण्याची मागणी करणारी याचिका सप्टेंबर 2023 मध्ये दाखल करण्यात आली होती. पूजेची मागणी करणारी याचिका सोमनाथ व्यासजी यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी केली होती. तळघर डीएमकडे सोपवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दुसरीकडे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापी प्रकरणात आपला अहवाल हिंदू आणि मुस्लिम पक्षांकडे सोपवण्यात आला. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, वादग्रस्त ठिकाणी देवी-देवतांच्या खंडित मूर्ती, हिंदू धर्माशी संबंधित अनेक चिन्हे, कमळाची फुले, घंटा इत्यादी वस्तू सापडल्या आहेत.