एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा इशारा असं दुहेरी संकट सध्या राज्यावर आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रातापर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान राज्यामध्ये जर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली तर याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.