तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोकणात पाहणी दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी रायगड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केल्यानंतर आज फडणवीसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
फडणवीस यांनी रोहा तालुक्यातील मेढ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुकसानाची पाहणी केली. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवांमध्ये खंड पडणे अजीबात परवडणारे नाही. त्यामुळे या केंद्राच्या फेरउभारणीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
या आरोग्य केंद्राचे असेच नुकसान निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी पण झाले आणि आता पुन्हा नव्याने झालेल्या बांधकामाला तौक्ते वादळाचा फटका बसला. वारंवार येणारी वादळे पाहता आता अशा इमारतींची संरचनाच बदलण्याबाबत राज्य सरकारने केला पाहिजे, अशी सूचनाही फडणवीसांनी केलीय.
दुसरीकडे वावे इथं एक घर कोसळलं. त्यामुळे लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय. तिथल्या नागरिकांशी चर्चा करुन फडणवीसांनी त्यांचा समस्या जाणून घेतल्या. तसंच त्यांच्या मदतीबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासनही दिलंय.
रायगड जिल्ह्यातील उसरमध्ये पाण्याची टाकी कोसळली. त्यामुळे याठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबतही फडणवीसांनी स्थानिकांकडून माहिती घेतली आणि मदतीसाठी पाठपुराव्याचं आश्वासन दिलं.
अलीबाग जेट्टी येथे वाळायला ठेवलेले ‘जवळा’ या पावसाने पूर्णपणे खराब झाले. त्यामुळे भविष्यातील अर्थार्जनाच्याही अनेक समस्या मासेमारांपुढे निर्माण होणार आहेत, याकडेही फडणवीसांनी सरकारचं लक्ष वेधलंय.
त्याचबरोबर खानाव, उसर आणि वावे या ठिकाणी वादळामुळे झालेल्या नुकसानीची फडणवीसांनी पाहणी केली.
अलिबाग बंदर येथे भेट देऊन मासेमार बांधवांशी संवाद साधला. बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.