पुण्यातील देहू नगरीत वारकऱ्यांचा मेळा जमलाय... कारण आजपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. आज संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 339 वा पालखी सोहळा आहे. आज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी भाविक देहूमध्ये दाखल झाले आहेत.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला.
स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरुवात करण्यात आली. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळयाचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.
सकाळी नऊ ते अकरा संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून बारा वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा असणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. तर सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्कामासाठी दाखल होईल. मग याच ठिकाणी रात्री नऊ वाजता किर्तन जागर. केला जाणार आहे.
राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी वेळेत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत वारकरी संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाची वारी विशेष असणार आहे.