पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या संघाची धुरा शुबमन गिलकडे आहे. नव्या संघाची बांधणी म्हणून या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. कारण विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या जागांसाठी चढाओढ असणार आहे.
टी20 विश्वचषक खेळणाऱ्या यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निव़़ड झाली आहे. मात्र संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्ये अडकल्याने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आला आहे. हर्षित राणा, साई सुदर्शन आणि जितेश शर्मा यांचा समावेश करण्यात आला.
संजू सॅमसन विकेटकीपर बॅट्समन असून त्याच्या जागी इशान किशनची वर्णी लागेल असा अंदाज होता. मात्र त्याच्या जागी पहिल्या दोन सामन्यांसाठी जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आलं आहे.त्यामुळे इशानचं टीम इंडियातील पुनरागमन लांबणार असंच दिसतंय.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर इशान किशन हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही होता. मात्र हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला. तसेच बीसीसीआयने वारंवार सूचना देऊनही देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही. थेट आयपीएलमध्येच इशान किशन दिसला. त्यामुळे त्याला डावलल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी -20 सामन्यासाठी भारताचा संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे, साई सुधारसन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा