भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. मात्र टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सरावादरम्यान केएल राहुल गंभीर जखमी झाला आहे. केएल राहुलला यामुळे सराव सोडून जावं लागलं.
भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून पर्थमधील WACA स्टेडियमवर सराव करत आहे. तयारी मजबूत व्हावी यासाठी टीम इंडिया आणि इंडिया ए यांच्यात सराव सामना खेळवला गेला.
पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू केएल राहुलला कळला नाही. केएल राहुलच्या कोपराला जोरात लागला. त्यामुळे कळवलला आणि जागेवरच बसला. त्यामुळे वैद्यकीय टीम तात्काळ मैदानात धावत आली. त्यानंतर राहुल कसाबसा उठला आणि खेळण्याचा प्रयत्न केला. पण असह्य वेदनांमुळे मैदान सोडावं लागलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलची दुखापत गंभीर नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून केएल राहुलने स्वत: सरावातून बाहेर पडला. दरम्यान, सराव करताना राहुलचा आक्रमक बाणा दिसला. त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूंचा जबरदस्त सामना केला.
केएल राहुल दुखापतीतून सावरला तर पहिल्याच सामन्यात ओपनिंगला उतरू शकतो. कारण रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यात केएल राहुल सावरला नाही तर ईश्वरनला संधी मिळेल. पण त्याच्याकडे अनुभवाची कमी असल्याने टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.