भारताने जून महिन्यात पार पडलेल्या आयसीसी चषकावर नाव कोरलं. भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. 17 वर्षांनी भारताने जेतेपद मिळवलं.
भारताने आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षांनी दूर केला. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचा योग जुळून आला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.
टी20 वर्ल्डकप विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाला द्यायलं हवं. पण कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलं आहे. रोहित शर्माने मुंबईत पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यात हे विधान केलं.
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली आहे. परिणामी भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
"या संघात बदल करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी खेळाडूंना पटवून दिले की, आकडेवारी आणि निकालाची जास्त काळजी करू नका. खेळाडू फारसा विचार न करता मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळू शकतील, असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे होते. हा प्रयत्न अखेर फळाला आला.", असं रोहित शर्माने सांगितलं.