केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने, तसेच सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेशासह अनेक राज्यातील युवकांनी रेल्वे, बसेसची जाळपोळ केली आहे. अनेक ठिकाणी सरकारी वाहनांवर दगडफेकही करण्यात आली आहे.
बलिया येथे युवकांनी हिंसक आंदोलन करत ट्रेनच्या बोगींना आग लावल्या. या आंदोलनामुळे बिहार , उत्तरप्रदेशमधील रेल्वेची सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
केंद्रसरकाराकडून घोषित करण्यात आलेली अग्नीपथ योजना केवळ तरुणाच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. या योजनेत केवळ चार वर्ष लष्करात काम करण्याची संधी दिली जाणार मात्र चार वर्षांनंतर त्या मुलांचे भविष्य काय असणार. त्यांना पुन्हा कुठे नोकऱ्या मिळणार असा संतप्त सवाल तरुण करत आहेत.
आंदोलक तरुणांकडून ही योजना रद्द करण्याची मागणी केली जात आहे. अमेठी, गाझीपूर येथे युवकांनी आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे .
आंदोलकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा सौम्या वापर केला, अनेक ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतले
या योजनेच्या विरोधात देशातील तब्बल 11 राज्यातील युवकांनी आंदोलने करत दगडफेक व जाळपोळ केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच ठेवण्यात आले आहे.
आंदोलनाची दाहकता लक्षात घेत ठीकठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे . आंदोलकांना पांगवण्याचे काम ही सुरु आहे.