इंडिया आघाडीला मोठा धक्का, सहा जणांची खासदारकी धोक्यात, कोण करणार बिग गेम?

| Updated on: Jun 11, 2024 | 10:12 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निकालाने स्पष्ट झाले. मात्र, हा निकाल लागून आठ दिवस पूर्ण होत नाही तोच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सहा खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे.

इंडिया आघाडीला मोठा धक्का, सहा जणांची खासदारकी धोक्यात, कोण करणार बिग गेम?
lok sabha election 2024
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लोकसभा निवडणुकीत भाजप, एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये पुन्हा एकदा देशात एनडीएची सत्ता आली. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मंत्र्याचे खातेवाटपही जाहीर झाले. भाजपमध्ये आनंदाचे वातावरण सुरु आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. इंडिया आघाडीच्या सहा खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 36 जागा जिंकल्या. त्यापैकी भाजपच्या 33 जागा आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने 43 जागा जिंकल्या आहेत. याच उत्तर प्रदेशमधील हे सहा खासदार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 2024 च्या सत्ताधारी भाजपपेक्षा विरोधकांना जास्त जागा मिळाल्या. मात्र, हे निकाल लवकरच धोक्यात येऊ शकतात. कारण, इंडिया आघाडीच्या सहा खासदारांवर अनेक गुन्हेगारी आरोप आहेत. यापूर्वी अनेक खासदारांना गुन्हेगारी खटल्यांमध्ये शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. मोहम्मद आझम खान, खब्बू तिवारी, विक्रम सैनी आणि अशोक चंदेल हे यातील काही नेते होत. याचप्रकारे इंडिया आघाडीच्या सहा खासदारांवर गुन्हेगारी खटले चालू आहेत. त्यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागेल.

उत्तर प्रदेशमधील गुंड आणि राजकारणी बनलेले मुख्तार अन्सारी यांचे मोठे बंधू अफजल अन्सारी हे गाझीपूरमधून निवडून आले आहेत. 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्तार यांचा मृत्यू झाला. अफजल अन्सारी हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांना गँगस्टर ॲक्ट प्रकरणात चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत ​ सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. परंतु, या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जुलैमध्ये न्यायालय सुरू होईल तेव्हा या प्रकरणाची सुनावणी होईल. जर न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली तर त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागेल.

आझमगडमधून सपाच्या तिकिटावर खासदार धर्मेंद्र यादव निवडून आले आहेत. त्यांच्यावरही चार फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यांनाही दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागेल. याशिवाय मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना NRHM घोटाळ्याशी संबंधित बाबू सिंह कुशवाह यांच्यावर 25 गुन्हे दाखल आहेत. त्यांनीही जौनपूरमधून निवडणूक लढवून ती जिंकली. बाबू सिंह कुशवाह यांच्यावरही शिक्षेची टांगती तलवार कायम आहे. त्यांनाही शिक्षा झाल्यास खासदारकी जाण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्या मेनका गांधी यांचा पराभव करून सुलतानपूरची जागा जिंकणारे रामभुआल निषाद हे आठ गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. वीरेंद्र सिंग (चंदौली) आणि इम्रान मसूद (सहारनपूर) या खासदारांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या खटल्यांमध्ये मनी लाँड्रिंग, धमकी देणे आणि गँगस्टर कायद्याच्या कलमांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यात हे खासदार दोषी आढळून त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवास झाला तर त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. यापूर्वी अनेक खासदारांना गुन्हेगारी खटल्यांमध्ये शिक्षा झाल्यानंतर त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले आहे.