मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार? मनोज जरांगेच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार तातडीने मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

| Updated on: Sep 05, 2024 | 11:32 AM

शिंदे गटाचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार? मनोज जरांगेच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार तातडीने मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
Follow us on

Abdul Sattar Manoj Jarange Patil Meet : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने झटणारे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची बंद दाराआड तब्बल 3 तास चर्चा झाली. पहाटे अडीच वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांची बैठक सुरु होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल भाष्य केले. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारने करावं, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.

शिंदे गटाचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यानंतर अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढावा. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, असेही मनोज जरांगे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

यानंतर अब्दुल सत्तार यांनी या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा केली. तसचे यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासनही अब्दुल सत्तार यांनी दिले. सरकारकडे आता केवळ 60 दिवस उरले आहेत. त्यामुळे आज मी स्वत: शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. तसेच आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.