शरद पवार यांना घरी बसवण्यासाठी अजितदादा गटाला भाजपची सुपारी; अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 30, 2023 | 9:02 PM

छगन भुजबळ सध्या मंत्री आहेत. मंत्री बाहेर स्टेटमेंट देतात ते योग्य नाही. मंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे. मंत्री कशासाठी असतो? त्यांनी बसून निर्णय घ्यायला पाहिजे. कॅबिनेटमध्ये आपले मत मांडायला पाहिजे. आपले विचार मांडायला पाहिजे. तिथे निर्णय घेऊन घ्यायला पाहिजे. पण छगन भुजबळ मागणी करतात हा आयोग रद्द करा, ते करा, ते करा... त्यांनी तशा पद्धतीची मागणी कॅबिनेटमध्ये करावी, असं अनिल देशमुख म्हणाले.

शरद पवार यांना घरी बसवण्यासाठी अजितदादा गटाला भाजपची सुपारी; अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप
anil deshmukh
Follow us on

वर्धा | 30 नोव्हेंबर 2023 : शरद पवार यांनी राजकारण करू नये. त्यांनी घरी बसावं यासाठी अजितदादा गटाला भाजपकडून सुपारी मिळालेली आहे, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अजितदादांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी वेगळी चूल का मांडलीय हे जगाला माहीत आहे. अनिल देशमुख यांना जसा त्रास झाला, तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणूनच आमचे सहकारी राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यामुळेच ते शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठीचं राजकारण करत आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. अजितदादांनी जो वेगळा निर्णय घेतला तो का घेतला हे सर्वाना माहिती आहे. त्यापूर्वी तीन दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपळला एक भाषण केलं आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार भाजपासोबत गेले, असं अनिल देशमुख म्हणाले.

अजितदादांना डावललं जातंय

त्यांचं काय अंतर्गत ठरलं ते माहीत नाही. सध्याची परिस्थिती आपण पाहत आहात. अजित पवार यांना भाजपने आपल्या सरकारमध्ये सामील केलंय. पण अजितदादा यांना कशा प्रकारे कॉर्नर केल जातं आहे हे आपण पाहताच आहात. निर्णय प्रक्रियेत असो की बाहेर राज्यातील प्रचारात अजितदादांचा समावेश नाहीये. एकनाथ शिंदे बाहेर राज्यात प्रचाराला गेले पण अजितदादांना पाठवलं नाही. त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केला पण एकप्रकारे अजित पवार यांना बाजूला ठेऊन निर्णय घेतल्या जातं आहे असं दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

आता कापूस, सोयाबीनला भाव द्या

सोयाबीनला भाव मिलावा म्हणून 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडी काढली होती. त्यावेळी दोघेही टाळ वाजवत मागणी करत होते. त्यावेळेस आमचं सरकार होतं. राज्य सरकारने सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार भाव दिल पाहिजे, अशी मागणी दोघेही करत होते. आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. तर पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी आता हा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी जी मागणी दहा वर्षांपूर्वी केली होती या दहा वर्षात अनेकदा दराचे चढ उतार झाले. त्यामुळे आता सोयाबीनला आठ आणि कापसाला चौदा हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे, असंही ते म्हणाले.

पक्ष कुणाचा जगाला माहीत

राष्ट्रवादीबाबतच्या निवडणूक आयोगातील सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलं. निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे आणि अनेक साक्षी झाल्या आहेत. सुनावणीचा निकाल काय येईल हे पाहू. एक गोष्ट नक्की आहे की, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणी वाढवला हे सर्वाना माहिती आहे. असं असताना पक्षही आमचा आणि चिन्हंही आमचं असं आमचे काही सहकारी दबावाखाली येऊन म्हणत आहेत. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. पण निवडणूक आयोगावर जर दबाव असेल तर निर्णय काय होणार याची कल्पना आहे. निवडणूक आयोगावर दबाव नसेल तर कायदा, नियम पाळून निर्णय द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याकडेच राहायला पाहिजे. दबावाखाली निर्णय द्यावा लागला तर निवडणूक आयोग काय निर्णय देईल हे माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.