अशोक चव्हाण यांचा राजीनामा, कॉंग्रेस नेत्याचा प्रदेशाध्यक्षांना इशारा; म्हणाले, काही दिवसात याचे परिणाम…

| Updated on: Feb 12, 2024 | 5:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार चा नारा दिला आहे. मात्र, हे 400 खासदार ते कशाच्या बळावर निवडून आणणार आहेत हे या घटनेवरून कळते. Party With Different म्हणणारा भाजप पक्ष दुसऱ्या पक्षात तयार झालेले नेते आपल्या पक्षात घेत आहेत.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा, कॉंग्रेस नेत्याचा प्रदेशाध्यक्षांना इशारा; म्हणाले, काही दिवसात याचे परिणाम...
ASHOK CHAVHAN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नागपूर | 11 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. यावर कॉंग्रस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी थेट नाना पटोले यांनाच इशारा दिलाय. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली हायकमांडने कांग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हायकमांडने फोन करून राज्यात सकाळपासून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. आज किंवा उद्या दिल्लीतून हायकमांडचे प्रतिनिधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कॉंग्रसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी ही धक्कादायक आणि आश्चर्यकारक बातमी आहे असे म्हटले आहे. काँग्रेसने चव्हाण यांना सगळीच पदे दिली. 2008 मध्ये 42 व्या वर्षी मुख्यमंत्री पद दिले. असे एकही पद नाही जे त्यांना दिले नाही. तरीही लोक पक्ष सोडून का जातात हा प्रश्न अनाकलनीय आहे. विचारधारेची आणि नीतीमत्तेची लढाई राहिली नाही अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार चा नारा दिला आहे. मात्र, हे 400 खासदार ते कशाच्या बळावर निवडून आणणार आहेत हे या घटनेवरून कळते. Party With Different म्हणणारा भाजप पक्ष दुसऱ्या पक्षात तयार झालेले नेते आपल्या पक्षात घेत आहेत. रेडिमेड कार्यकर्ते आणि सरकार ते घेत आहे. नवीन कार्यकर्ते, नेते तयार करत नाही. त्यामुळे भाजप 400 खासदार कसे निवडून आणणार याचे हे उदाहरण आहे, असा टोलाही विलास मुत्तेमवार यांनी लगावला.

कॉंग्रेसचे माजी मंत्री नितिन राऊत यांनी राज्यात धक्कादायक घडामोडी घडत आहे असे म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व ज्यांना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षपद दिले. ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. त्यांनी राजीनामा का दिला त्यामागची करणे माहिती नाही. त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला. पण, मोबाईल वर संपर्क होऊ शकला नाही. पक्ष म्हणून आम्हाला वेदना झाल्या असे राऊत म्हणाले.

कॉंग्रेस नेत्यांवर दबाव आणून पक्ष प्रवेश केला जात आहे. जो पक्ष घाबरला आहे तो अशा पद्धतीचा दबाव आणून संख्येचे गोळा बेरीज करत आहे. त्यांना राज्यात विजय मिळेल असे वाटत नाही. 1980 मध्ये अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले पण पक्षाला नवीन उभारी घेतली. मी विचार धारेला मानणारा आहे. त्यामुळे माझ्यासोबत कोणताही पक्ष संपर्क करेल असे वाटत नाही असेही नितीन राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रा पुढे जात असल्याने पक्षाचे खच्चीकरण केले जात आहे. सत्ताधारी पक्ष घाबरलेले आहे. त्यामुळेच अशी कृत्ये केली जात आहेत. कोणत्याही पक्षात नाराजी असते. काही नेत्यांना वाळीत टाकलं असेल. पण, त्याचा अर्थ पक्ष सोडून जाणे होत नाही. दिल्ली याबाबतीत बारीक लक्ष देऊन आहे. येणाऱ्या काही दिवसात याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील असा इशारा नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.