ते ठरवणारे मनोज जरांगे पाटील कोण?; बबनराव तायवाडे यांचा जरांगे यांना खरमरीत सवाल

| Updated on: Nov 25, 2023 | 7:05 PM

ओबीसींचे सगळेच नेते उद्याच्या ओबीसी मेळाव्याला येणार आहेत. ओबीसी नेत्यांमध्ये कुठलाही वाद-विवाद झालेला नव्हता. थोडासे मतभेद झालेले होते. ते सगळे दूर झाले आहेत. त्यामुळे आता ओबीसींचे सगळे नेते उद्याच्या ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ बोलले तेव्हा काही वेळ काही लोकांना वाईट वाटलं. मात्र त्यांनी नंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहेत. त्यानंतर सगळे मतभेद दूर झाले आहेत, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.

ते ठरवणारे मनोज जरांगे पाटील कोण?; बबनराव तायवाडे यांचा जरांगे यांना खरमरीत सवाल
babanrao taywade
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 25 नोव्हेंबर 2023 : ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागते, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जरांगे पाटील यांच्या या विधानाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी निषेध नोंदवला आहे. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावे लागते, असं जरांगे म्हणतात. म्हणजे ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये कोणतीच लायकी नाही असं म्हणायचं का? ओबीसी नेत्यांमध्ये लायकी नाही हे ठरविणारे मनोज जरांगे पाटील कोण?, असा संतप्त सवाल बबनराव तायवाडे यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

कोणामध्ये लायकी आहे आणि कोणामध्ये नाही हे त्याच्या शिक्षणावरून आणि त्याचा समाजात असलेल्या स्थानावरून ठरविल्या जाते. त्यामुळे जरांगे पाटील यांचं हे विधान हा ओबीसी समाजावर केलेला अन्याय आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जर ओबीसी समाज आक्रमक झाला आणि ओबीसी मराठा संघर्ष झाला तर पूर्णता जबाबदारी हे जरांगे पाटलांची राहणार आहे, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

भूमिकेवर ठाम

जरांगे याना काय मागायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर वक्तव्य करणार नाही. मात्र संपूर्ण ओबीसी समाज, ओबीसी समाजाचे नेते जी भूमिका घेऊन आंदोलनात उतरले होते ती कायम आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये. त्याचप्रमाणे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देऊ नये अशी आम्ही भूमिका व्यक्त केली होती. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असंही तायवाडे यांनी सांगितलं.

त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही हे सरकारने सुद्धा ते मान्य केलं होतं. सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांचं यावर एकमत झालेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीकडे मी लक्ष देणे बंद केलं आहे, असंही ते म्हणाले.

खालच्या स्तरावर बोलत आहेत

जरांगे पाटील यांचे वक्तव्य आता खालच्या स्तरावरचे व्हायला लागले आहेत. आम्हाला त्याचं आश्चर्य वाटायला लागलंय. मागील तीन महिन्यात आम्ही कधीही त्यांच्या विरोधात बोललो नाही. मात्र त्यांनी आता खालच्या स्तरावरची भाषा वापरायला सुरुवात केली, अशी टीका त्यांनी केली.

जरांगे यांनी प्रुव्ह करून दाखवावं

राज्यातील कोणत्या संघटनेने किंवा ओबीसी नेत्याने त्यांच्या आरक्षणाला विरोध केला हे जरांगे पाटील यांनी दाखवून द्यावे. आरक्षणाची सुरुवात कशी झाली याचा जरांगे पाटील यांचा अभ्यासच नाहीये. सरकारने नियमानुसार आरक्षण दिलेलं आहे. त्यात कुणाचेही नाव उचलून टाकलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वज्रमूठ कायम राहणार

सगळ्या नेत्यांना ओबीसी समाजासाठी काम करायचं आहे आणि ते कटिबद्ध असल्यामुळे जो मतभेद झाला होता तो संपला आहे. सगळे नेते विचारपीठावर एकदिलाने एकत्र येऊन ओबीसीच्या संविधानाचा रक्षण करण्यासाठी वज्रमठ बांधणार आहेत. ही वज्रमूठ नेहमीसाठी राहणार नाही, असंही ते म्हणाले.