Bhawana Gawali ED: ‘भावना गवळी हाजीर हो..’ ईडीकडून चौकशीसाठी समन्स, चौकशीला न आल्यास अटक होणार?

| Updated on: Apr 29, 2022 | 7:49 AM

भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजवाण्यात आलेलं होतं. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीला येऊ शकत नाही, असं त्यांनी कळवलं होतं.

Bhawana Gawali ED: भावना गवळी हाजीर हो.. ईडीकडून चौकशीसाठी समन्स, चौकशीला न आल्यास अटक होणार?
भावना गवळी, शिवसेना खासदार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांना ईडीनं समन्स (ED) बजावलं आहे. पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. दरम्यान, यावेळी जर शिवसेना खासदार (Shiv sena MP) भावना गवळी चौकशीसाठी गेल्या नाहीत, तर त्यांच्याविरोधात वॉरंट निघण्याची शक्यता आहे. हे वॉरंट अजामीनपत्र असेल. त्यामुळे यावेळी जर ईडीच्या समन्सनुसार जर भावना गवळी चौकशीला गेल्या नाहीत, तर मात्र त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असं सांगितलं जातंय. पुढील आठवड्यात भावना गवळी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधीही भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजवाण्यात आलेलं होतं. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीला येऊ शकत नाही, असं त्यांनी कळवलं होतं. मात्र आता आलेल्या समन्सनुसार, शिवसेना खासदार भावना गवळी चौकशीला हजर राहतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.

नेमकं प्रकरण काय?

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळाप्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाते आहे.

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम येथे झाला. माजी खासदार दिवंगत पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.

राजकीय प्रवास

लहान वयातच भावना गवळी राजकीय क्षेत्रात उतरल्या. भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवला. उत्तरोत्तर राजकारणातील आपलं स्थान त्यांनी भक्कम केलं. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पाहा महत्त्वाच्या हेडलाईन्स :