170 ते 180 जागा लढवा, भाजपच्या बैठकीतील सूर; महायुतीतील घटक पक्षांचं टेन्शन वाढणार?

| Updated on: Jul 18, 2024 | 7:45 PM

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची आज दुसरी बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

170 ते 180 जागा लढवा, भाजपच्या बैठकीतील सूर; महायुतीतील घटक पक्षांचं टेन्शन वाढणार?
BJP leaders
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजपच्या नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला केंद्रातील दोन महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. यावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत 170 ते 180 जागा लढवण्याचा सूर आळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याला वरिष्ठ नेत्यांचीही अनुकूलता असल्याचंही कळतंय. विधानसभा निवडणुकीला अवघे दोन अडीच महिने बाकी असताना भाजप नेत्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा मागितल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजितदादा गटाला टेन्शन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीत चुळबुळ सुरू होण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

भाजपची आज मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णवही उपस्थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. भाजप किती जागांवर लढू शकतो आणि विजयी होऊ शकतो याची चर्चा करण्यात आली. तसेच लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो आणि लोकसभा निवडणुकीत कमी झालेल्या मतांची कसर कशी भरून काढता येईल यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

पुण्यात शिक्कामोर्तब

यावेळी राज्यातील स्थानिक नेत्यांनी महायुतीत भाजपने 170 ते 180 जागा लढवल्या पाहिजेत असा आग्रह धरला. जेवढ्या जागा जास्त लढू, तेवढा अधिक फायदा होईल, असा सूर या बैठकीत आळवण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यासाठी लोकसभा निवडणुकीचा दाखलाही देण्यात आला. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा लढवल्याचा फायदा झाला आहे, असा दावा या नेत्यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, भाजप कार्यसमितीची आता पुण्यात बैठक होणार आहे. त्यात राज्यातील नेत्यांच्या या मागणवीर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दादाला हव्यात 80 जागा

दरम्यान, अजितदादा गटाने यापूर्वीच 80 जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वात आधी 80 जागांची मागणी केली. त्यानंतर अजितदादांनीही मागणी केली आहे. आपल्याकडे अधिक आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्येएवढेच आमदार आपल्याकडेही असल्याने आपल्यालाही समान वाटा मिळाला पाहिजे, असं अजितदादा गटाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही विधानसभेच्या 80-85 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मतदार संघ बदलू शकतो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाची बैठक बोलावली होती. यावेळी मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. आघाडीकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. तसेच मतदारसंघांची आदलाबदल होऊ शकते. त्यामुळे मनाची तयारी ठेवा, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.