अंतरवली हल्ल्याची पहिली बाजू समोर आलीच नाही, गृहखातं जबाबदार; छगन भुजबळ यांचा घरचा आहेर

| Updated on: Nov 27, 2023 | 6:42 PM

मी बोलल्याने वातावरण बिघडेल असं सांगितलं जात आहे. मी बोलल्यावर वातावरण कसे बिघडेल? भुजबळांनी एक तरी दगड मारला का? टायर तरी जाळला का? बीड कुणी जाळलं? उलट बीड जाळणारे पकडले म्हणून त्यांना सोडा म्हणतात, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच संभाजी महाराजांबद्दल माझ्या मनात आदर आहे. ते ज्या गादीवर बसले आहेत, त्याचा अर्थ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व घटकांना समान न्याय दिला पाहिजे, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं.

अंतरवली हल्ल्याची पहिली बाजू समोर आलीच नाही, गृहखातं जबाबदार; छगन भुजबळ यांचा घरचा आहेर
chhagan bhujbal
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील अंतरवली सराटीत आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला होता. या लाठीमारमध्ये आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. महिला पोलिसांनाही मार लागला होता. हा लाठीमार होऊ दोन महिने उलटून गेले तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या लाठीमारवरून अजूनही आरोपप्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तर अंतरवली घटनेची पहिली बाजू समोर आलीच नाही, त्याला देवेंद्र फडणवीस यांचं गृहखातंच जबाबदार असल्याचं सांगत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. भुजबळ यांच्या या विधानामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. बीडमध्ये जाळपोळ होते. काहीच केलं जात नाही. अंतरवलीत पोलिसांवर दगडफेक झाली. महिला पोलिसांसह 70 पोलीस जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात हिंमत असेल तर त्या महिला पोलिसांना जाऊन विचारा. त्यांच्यावर हल्ला कसा झाला? त्यांना काय वागणूक दिली हे विचारा. महिला पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. या जखमा बुजतील इतर जखमा पुसता येणार नाही. अंतरवलीच्या हल्ल्याची पहिली बाजू जनतेसमोर आली नाही याला एसपी जबाबदार आहे. होम डिपार्टमेंटही जबाबदार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

फडणवीस यांच्याशी बोललो

अंतरवलीच्या हल्ल्याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. पोलीस हतबल होता कामा नये. त्यांचं खच्चीकरण होता कामा नये. आपण पोलिसांना विश्वास दिला पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. जिथे बोलायचं तिथे मी बोललो आहे. जी ऑल पार्टी मिटिंग होती, तिथेही मी बोललो. या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझी मागणी त्यावेळी सगळीकडे पोहोचली होती, असंही ते म्हणाले.

बाकीच्यांचं काय घेऊन बसला

अंतरवली सराटीत पोलिसांवर हल्ले झाले. महिला पोलिसांवर हल्ले झाले. मग बाकीचे आमदार आणि समान्य माणसं काय यांचं काय घेऊन बसला. या हल्ल्यानंतर पोलीस थोडे हतबल झाले आहेत. एवढे पोलीस जखमी होऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांना विश्वास देणं गरजेचं आहे. जनता तुमच्या मागे आहे हे सांगितलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.

विदूषकपणा कोण करतंय?

जरांगे पाटील यांनी भुजबळांना विदूषक म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी विदूषक आहे की कोण आहे जे म्हणायचं ते म्हणा. जरांगे यांनी एका मुलाखतीत काय म्हटलं? पोलिसांनी आपआपसात मारामारी केली. एकमेकांना पोलिसांनी मारलं असं त्यांनी सांगितलं. असं सांगणं हा विदूषकपणा आहे. हॉटेल जाळलं तर म्हणे भुजबळांच्या पाहुण्यांनी जाळलं. त्याआधी म्हणाले, प्रशासनाने जाळलं. आता विदूषकपणा कोण करतंय हे तुम्हीच ठरवा, असंही त्यांनी सांगितलं.