अहमदनगर : (Radhakrishna Vikhe-Patil) राधाकृष्ण विखे-पाटील कधी काळी कॉंग्रेसमधील एक प्रमुख नेते होते. त्यांची राजकीय कार्यकीर्दही याच पक्षापासून सुरु झाली होती. पण आता (Congress Party) कॉंग्रेस हा पक्ष आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठीच धडपड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 20 वर्ष कॉंग्रेसमध्ये राहून युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे-पाटील हे शिवसेनेमध्येही दाखल झाले होते. त्यानंतर 2019 लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी (BJP Party) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कॉंग्रेस हा वास्तवापासून दूर जात असून या पक्षाची दैयनिय अवस्था झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही, याचा अनुभव राज्यातील जनता गेल्या अडीच महिन्यापासून घेत आहेच पण ज्या पक्षामध्ये जडणघडण झाली त्यावरही विखे-पाटलांनी जहरी टीका केली आहे.
कॉंग्रेस पक्षाकडून केवळ केंद्र सरकारवर टीका करुन आपले अस्तित्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात पक्षाचा जो अजेंडा होता त्याचा विसरच पक्षाला पडलेला आहे. शिवाय जनतेच्या प्रश्नाचे काही देणेघेणे राहिलेले नाही, त्यामुळे जनतेचाही विश्वास या पक्षाने गमावला असल्याचे विखे-पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यातले नेते महाविकास आघाडीत सरकारमध्ये गेले, ते आपल्या अस्तित्वासाठी. पक्षाला अपमानित वागणूक मिळाली तरी सुद्धा गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकून राहिलेले आहेत.
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीही दिला जाईल. याबाबत वरीष्ठ निर्णय घेतील पण त्यामुळे कोणते काम रखडले असे नाही. राज्य सरकारने आपल्या कामाचा धडाका सुरु ठेवलेला आहे. त्यामुळे जनतेची कामे रोखली जात नाहीत. सरकारचा उद्देश आणि जनतेची कामेही अशा दोन्हीही गोष्टी होत असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले आहे.
सत्तांतरानंतर धोरणेही बदलत आहेत. मविआ सरकारच्या काळात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक वाळू उपसा केला जात होता. त्या बदल्यात कोणताही मोबदला सरकारला मिळत नव्हता. आर्थिक स्वार्थासाठी हे केले जात असल्याचे म्हणत विखे-पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. आता कारवाई करण्याच्या मी सूचना दिल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत नगर जिल्ह्यातून बेकायदेशीर वाळू उपसा होणार नाही असेही ते म्हणाले आहेत.