EXPLAINER | ‘डरना नहीं है’, राहुल गांधी यांचा कुणाला इशारा, कुणाला संदेश? अध्यक्ष यांची द्विधा मनस्थिती

| Updated on: Jul 01, 2024 | 10:47 PM

लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्या भाषणात अनेक संदेश आणि संकेत दडलेले आहेत. सत्ताधारी पक्ष, विरोधक, काँग्रेस, लोकसभा अध्यक्ष आणि जनता… प्रत्येकासाठी काही न काही संदेश त्यांनी दिला. नेमकं त्यांनी काय सांगितले? त्याचा अर्थ काय?

EXPLAINER | डरना नहीं है, राहुल गांधी यांचा कुणाला इशारा, कुणाला संदेश? अध्यक्ष यांची द्विधा मनस्थिती
rahul gandhi, Narendra modi and om birla
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

राहुल गांधी यांचे लोकसभेत भाषण चांगलेच गाजले. नव्हे ते भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले. अनेक वेळा त्यांच्या भाषणात सत्ताधरी पक्षाने अडथळे आणले. अनेक वेळा गदारोळ केला. पण पण ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. पण, ‘डरना नहीं है’ या धर्तीवर राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण भाषणातून भाजप, पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. शिवाय त्यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा दिला. तर अनेकांना संदेशही दिला. लोकसभेत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते म्हणून भाषण करताना राहुल गांधी यांनी आगामी काळातील आपल्या आक्रमकतेची चुणूकही सत्ताधारी पक्षाला दाखविली.

राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण 1 जुलै रोजी केले. सुमारे अडीच तासांच्या भाषणात राहुल गांधी यांनी सर्व प्रथम विरोधक संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याच्या कथनाला बळ दिले. आपल्या सहकारी खासदारांकडून त्यांनी संविधानाची प्रत मागितली. ती ओवाळली आणि ‘जय संविधान’चा नारा त्यांनी दिला. राहुल गांधी यांना भाषणामध्ये सत्ताधारी पक्षाने खोड घालण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधी यांनी ‘डरना नहीं है’ या धर्तीवर संपूर्ण भाषणात भाजप, पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. अनेक ठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकाही केली.

सत्ताधारी पक्षाला इशारा

राहुल गांधी यांनी यावेळी विरोधकांचे हल्ले सहन केल्याशिवाय राहता येणार नाही, असा संदेश दिला. सरकारी एजन्सी आणि संस्थांचा कथित गैरवापर, मणिपूर, महागाई, एमएसपी, अग्निपथ, बेरोजगारी या मुद्द्यांवर राहुल यांनी आपल्या खास शैलीत सरकारला धारेवर धरले. त्यांच्या भाषणाला 20 मिनिते होत नाहीत तोच पंतप्रधान मोदी यांना उठावे लागले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला. विरोधी पक्षनेतेपद गांभीर्याने घ्यायला हवे असे संविधानाने मला शिकवले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

बड्या मंत्र्यांनाही उठणे भाग पाडले

राहुल यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय मंत्री किरेन रिजिजू, मंत्री शिवराज सिंह चौहान, मंत्री भूपेंद्र यादव यांना उभे राहून आपले म्हणणे मांडावे लागले. कधी राहुलच्या बोलण्यावर आक्षेप घेणे किंवा स्पष्टीकरण देणे तर कधी अध्यक्ष यांना विनंती करणे हेच त्यांच्या हाती राहिले होते.

जनतेला काय दिला संदेश?

राहुल गांधी यांनी या भाषणातून जनतेच्या संबंधित प्रश्नांवर लोकसभेत बोलू, असा संदेश जनतेला दिला. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, ईडी-सीबीआयच्या गैरवापराचे आरोप यांसारख्या मुद्द्यांवर ते जे बाहेर बोलत होते तेच मुद्दे त्यांनी सभागृहात उपस्थित करून जनतेला आश्वस्त केले. जनतेचा आवाज सभागृहात बुलंद होत राहील. आवश्यक असल्यास नियमांची पर्वा न करता, लोकांचे अधिकृत मत व्यक्त करतील. भाजपने राहुल गांधी यांची जी प्रतिमा निर्माण केली आहे, त्याची सत्यता जनतेने पारखली पाहिजे, असाही एक संदेश यातून दिला आहे.

काँग्रेस आणि विरोधी सहकाऱ्यांना महत्वाचा संदेश

विरोधी पक्षनेते या नात्याने आपण सर्व पक्षांचा आवाज बनू. सहकाऱ्यांना त्यांनी युतीची एकजूट कायम ठेवा. याशिवाय भविष्यातही एकत्र निवडणुका लढवण्याची गरज आहे, असा संदेश राहुल यांनी भारत आघाडीतील मित्रपक्षांना दिला. राहुल यांनी आपल्या भाषणातून काँग्रेससाठीही एक महत्वाचा संदेश दिला. भाजपच्या रामाचे उत्तर आता शिवबातून द्यायला हवे हा तो संदेश. याप्रमाणेच राहुल गांधी यांच्याकडे खंबीर नेतृत्व क्षमता असल्याचा संदेशही त्यांनी काँग्रेसला दिला.

अध्यक्ष ओम बिर्ला यांची द्विधा मनस्थिती

विरोधकांच्या आवाजाला जागा द्या आणि भेदभाव न करता कामकाज चालवा, असा संदेशही राहुल गांधी यांनी अध्यक्ष यांना दिला. माइकचा ताबा कोणाच्या हातात आहे? माझ्या बोलण्यामध्येच माईक बंद होतो. तुम्ही विरोधी पक्षनेत्याला नव्हे तर सभागृहात नतमस्तक होऊन नरेंद्र मोदींना भेटता, याची स्पष्ट आठवण त्यांनी करून दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी, राहुल गांधी यांना सवलत दिली जात आहे. ते नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. सत्ताधाऱ्यांना संरक्षण हवे आहे. राहुल गांधी आणि अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची द्विधा मनस्थिती झाली होती हे ही या भाषणादरम्यान दिसून आले.