Devendra fadnavis On Narayan Rane : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांपूर्वी कोसळला. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले होते. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुतळा कोसळल्याबद्दल भाष्य केले. आम्ही नेव्हीसोबत बैठक घेतली. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला परवानगी द्या, आम्ही भव्य पुतळा उभारू. चांगला क्वालिटीचा पुतळा देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘टीव्ही 9 मराठी’चा एक कॉन्क्लेव्ह कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. तसेच ठाकरे विरुद्ध राणे यांच्यात राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याबद्दलही विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. मी राणेंचं समर्थन केलं नाही. पण विरोधकांनी जोडे मारो आंदोलन करणं हे त्यांना शोभत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“माझं स्टेटमेंट एकलं तर मी जबाबदारी ढकलली नाही. ही पीडब्ल्यूडीने तयार केलेला पुतळा नाही, नौदलाचा आहे. ही घटना दुखद आहे. त्यात झालेल्या चुका सुधाराव्या लागतील आणि महाराजांचा भव्य पुतळाही उभारावा लागेल. पंतप्रधान, मुख्यमंत्री, अजितदादा आणि मीही माफी मागितली. आम्ही जबाबदारी ढकलली नाही. ही घटना लाजीरवाणी आहे. आम्ही नेव्हीसोबत बैठक घेतली. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला परवानगी द्या, आम्ही भव्य पुतळा उभारू. चांगला क्वालिटीचा पुतळा देऊ”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
“अशावेळी वक्तव्य अधिक संवेदनशील केली पाहिजे. शेवटी महाराज हे मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं हिंदू समाजाचं आराध्य दैवत आहे. जेव्हा दैवताची मूर्ती भंजन होते. तेव्हा दुख होतं. सर्वांनाच दुख होतं. यातील एक विषय आहे की, ज्या प्रकारे यावर राजकारण केलं गेलं. आपल्या दैवताच्या मूर्तीचं भंजन झाल्यावर त्याचे फोटो व्हायरल करणार का? पण राजकीय फायद्यासाठी फोटो व्हायरल केले गेले. मला वाटतं विरोधकांना दु:ख किती झालं आणि राजकीय संधी किती दिसली. काही संधी असते त्यात संधी साधा. पण अशा गोष्टीत झाली नाही पाहिजे. टीका करा. पण राजकीय संधी साधणं चुकीचं आहे”, असेही फडणवीसांनी म्हटले.
“विरोधकांचं या विषयात जे वागणं झालं ते चुकीचं आहे. ते राजकीय होतं. अशावेळी सर्वांनी संवेदनशील वागलं पाहिजे. मी राणेंचं समर्थन केलं नाही. पब्लिकली केलं नाही. पण विरोधकांनी जोडा मारो आंदोलन केलं. इतके मोठे नेते त्या ठिकाणी हातात चप्पल घेऊन आले. आम्हाला काय फरक पडतोय. हे शोभत नाही. इतक्या खालच्या थरावर जाणं”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.