EXPLAINER | चार दशकांपूर्वीचा भाजपचा जुना फॉर्म्युला; महाराष्ट्रात पुन्हा ‘माधव’, आता गरज का भासली?

| Updated on: Jul 04, 2024 | 8:34 PM

भाजपला सुमारे चार दशके बाजूला ठेवलेल्या 'माधव' फॉर्म्युल्याची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर पुन्हा एकदा राज्यात 'माधव' फॉर्म्युला अमंलात आणला आहे. काय आहे 'माधव' फॉर्म्युला? आगामी विधानसभा निवडणुकीत याचा भाजपला फायदा होईल का?

EXPLAINER | चार दशकांपूर्वीचा भाजपचा जुना फॉर्म्युला; महाराष्ट्रात पुन्हा माधव, आता गरज का भासली?
devendra fadnavis, pankaj munde, sadabhau khot
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले आहे. तर भाजपच्या कमी जागा निवडून आल्याने पक्ष राजकीय समीकरणे साधण्यात व्यस्त आहे. त्यामुळे भाजपला सुमारे चार दशके बाजूला ठेवलेल्या ‘माधव’ फॉर्म्युल्याची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर पुन्हा एकदा राज्यात ‘माधव’ फॉर्म्युला अमंलात आणला आहे. काय आहे ‘माधव’ फॉर्म्युला? आगामी विधानसभा निवडणुकीत याचा भाजपला फायदा होईल का? काय सांगतात जातीय समीकरणे?

सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे भाजप दीर्घकाळ राजकारण करत आहे. मात्र, 2014 नंतर मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला मागे पडला होता. 2024 च्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे दृश्य परिणाम पहायला मिळाले होते. त्यामुळेचा भाजपला आता विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधी राज्यात ओबीसी मतांची भर पडावी यासाठी पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युलाकडे जाणे भाग पडले आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. यातील तीन उमेदवार ओबीसी समाजातील आहेत. तर प्रत्येकी एक उमेदवार दलित आणि मराठा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी वंजारी समाजातून येतात. ओबीसी समाजामध्ये माळी, धनगर आणि वंजारी हे प्रमुख समाज आहेत. पुण्यातील योगेश टिळेकर हे माळी समाजातील आहेत. तर, डॉ. परिणय फुके हे देखील ओबीसीतील कुणबी जातीतून येतात. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रात ओबीसी मतांवर आपले राजकारण केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

अमित बोरखे आणि सदाभाऊ खोत हे दलित आणि मराठा समाजातीलही उमेदवार भाजपने दिले आहेत. राज्यात 31 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा आहेत, तर ओबीसी 40 टक्क्यांच्या जवळपास आहे. परंतु, ते 356 पोटजातींमध्ये विभागले गेले आहेत. या दोन समाजांना आपल्या गोटात आणण्याची रणनीती सध्या भाजप आखत आहे.

भाजप नेते वसंतराव भागवत यांनी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, महादेव शिवणकर या नेत्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात ओबीसी समाज प्रामुख्याने माळी, धनगर आणि वंजारी (माधव) यांना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल होते. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रमुख चेहरा होते. पण, 2014 मध्ये त्यांच्या निधनामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. 2014 च्या निवडणुकीपासून राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजप नेतृत्वाने डझनभर मराठा नेत्यांना पक्षात सामील केले.

भाजप नेतृत्वाने ओबीसी नेत्यांना पूर्णपणे बाजूला केले. ब्राह्मण समाजातून येणारे देवेंद्र फडणवीस भाजपचा मुख्य चेहरा झाले. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबरोबरच मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा दिल्याने ओबीसी जातींमध्ये नाराजी वाढली. त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. ही चूक विधानसभा निवडणुक पुन्हा होऊ नये यासाठी पुन्हा एकदा ओबीसी जातींना महत्त्व देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. त्याचवेळी मराठा आणि दलित समाजाला राजकीय महत्त्व देऊन समतोल साधण्याचीही रणनीती आखण्यात आली आहे.