कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसला बहुमत; वाचा काँग्रेसच्या विजयाची 6 महत्वाची कारणं

| Updated on: May 13, 2023 | 5:45 PM

Congress Wins Karnataka Assembly Election 2023 : 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसचा विजय; 'या' सहा कारणांमुळे काँग्रेसचा विजय झाला, वाचा सविस्तर...

कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसला बहुमत; वाचा काँग्रेसच्या विजयाची 6 महत्वाची कारणं
Follow us on

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला अन् देशभर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काँग्रेसला 136 जागा जिंकता आल्या आहेत. तर भाजपला केवळ 65 जागा जिंकल्या आहेत. 22 वर्षांनंतर काँग्रेसला इतक्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकात यश मिळवता आलं आहे. काँग्रेसच्या पराभवाची कारणं नेमकी काय आहेत? पाहूयात…

1.भ्रष्टाचाराचा मुद्दा

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला. बोम्मई सरकारला ’40 टक्के सरकार’ आणि मुख्यमंत्री बोम्मई यांना ‘पे सीएम’ अशी नावं दिली. ठिकठिकाणच्या भाषणांमध्ये याचा वारंवार उल्लेख करण्यात आला. काँग्रेसने वारंवार भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे केला. एस. ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर एका आमदाराला तुरूंगातही जावं लागलेलं. त्यामुळे या मुद्द्यांच्या आधारी काँग्रेसने भाजपला घेतलं.

2. जाहीरनाम्यातून जनतेच्या मनात घर

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून जनतेच्या मनात घर केलं असं म्हणता येईल. या काँग्रेसचं सरकार आल्यास गृहज्योती योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असा शब्द दिला. शिवाय गृहलक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहिन्याला 2000 रुपये देण्याचीही घोषणा केली. यासारख्या योजनांना लोकांनी आपलंसं केल्याचं या निकालातून दिसतं.

3. एकजूटीचा परिणाम

निवडणुकीच्या काळात पक्षाच्या नेत्यांना एकसंध ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान काँग्रेससमोर होतं. काँग्रेसने निवडणुकीच्या वर्षभर आधीपासूनच पक्षाला मजबूत करण्याचे आणि एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

4. प्रचाराची पद्धत

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत आक्रमकपद्धीने प्रतार केला. अनेक वर्षांनंतर सोनिया गांधी यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना दिसल्या. कर्नाटकात त्यांनी रॅली काढली. राहुल गांधी, प्रियांका गांधीही कर्नाटकात होते. राहुल गांधींनी 11 दिवसात 23 रॅली आणि 2 रोड शो केले. तर प्रियांका गांधी यांनी 9 दिवसात 15 रॅली आणि 11 रोड शो केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या गृहराज्यात 15 दिवसांत 32 रॅली आणि रोड शो केले. याचा परिणाम निकालात दिसला.

5. स्थानिक मुद्दे

कर्नाटकात काँग्रेसने केंद्रातील प्रमुख मुद्द्यांवर तर भाष्य केलंच. शिवाय स्थानिक प्रश्नांकडेही त्यांनी लोकांचं लक्ष वेधलं. अदानी-हिंडनबर्ग प्रकरण, राहुल गांधींची अपात्रता, ईडी-सीबीआयची कारवाई, काम आणि महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आणि आरक्षण या सारख्या मुद्द्यांवर काँग्रेसने जोर दिला.

6. येणाऱ्याने येत जावें…

कर्नाटक निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये खदखद होती. काही नेते नाराज होते. या नेत्यांना काँग्रेसने पक्षात घेतलं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि एस. शेट्टार या नेत्यांना काँग्रेसने पक्षात घेतलं. यामुळे लिंगायत समाजाचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला.