लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार अन् आम्हाला सात मंत्रिपदं मिळणार!; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

| Updated on: Jul 11, 2023 | 1:47 PM

Bharat Gogawale on Maharashtra Cabinet Expansion : आम्हाला सात मंत्रिपदं मिळतील; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा दावा

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार अन् आम्हाला सात मंत्रिपदं मिळणार!; शिवसेनेच्या या नेत्याचा दावा
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. अशात शिवसेनेकडून 7 जागांवर दावा करण्यात आला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एक ते दोन दिवसांमध्ये हा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्हाला तयारीत राहायला सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही तयारीत बसलो आहे. कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू, असं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला 7 मंत्रिपदं

शिवसेनेला 7 मंत्रिपदं मिळतील, असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. तसंच भाजपलाही सात मंत्रिपदं मिळणार आहेत. आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्या पद्धतीने हा विस्तार होईल, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.

रायगडचं पालकमंत्रिपद कुणाकडे?

आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळणं शक्य नाही. हे राष्ट्रवादीलाही ठाऊक आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार आहे. कारण पालकमंत्री झाल्याशिवाय रायगडचा विकास होणार नाही. आमचे तिथं पाच आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद रायगडला मिळणं आणि ते देखील मला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलाय ते शब्द ते पाळतील असा मला विश्वास आहे, असंही गोगावले म्हणालेत.

आमच्या नेत्यांची राष्ट्रवादीवर कुठलीही नाराजी आहे, असा आम्हाला सध्या वाटत नाही. लवकरच आम्ही त्यांच्यासोबतही जुळवून घेऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असंही गोगावले म्हणालेत.

संजय राऊतांना टोला

संजय राऊत जे बोलतात त्याचे नेमकं उलट होतं. दरवेळी ते काही ना काही बोलत राहतात. तारीख वर तारीख देत राहतात. आता शिंदे सरकारला एक वर्ष झालेलं आहे. पण राऊतांच्या दाव्याप्रमाणे सरकार काही पडलं नाही. ते वारंवार तारीख देत राहिले. पण आमचे सरकार चालत राहिलं. त्यामुळे त्यांनी बोलत राहावं. जेणेकरून त्याच्या सगळ्या उलट होईल आणि सरकार सुरूच राहील, असं म्हणत भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला. फडणवीस यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख ठाकरेंनी केला. त्यावरही गोगावले यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, असं गोगावले म्हणालेत.