महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ, तुम्ही तुमचं बघा…; एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना फटकारलं

| Updated on: Jun 27, 2023 | 3:01 PM

CM Eknath Shinde on K. Chandrashekar Rao : केसीआर यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा...

महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ, तुम्ही तुमचं बघा...; एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना फटकारलं
Follow us on

ठाणे : महाराष्ट्राचं आमचं आम्ही बघू तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला आहे. तो पक्ष सांभाळावा. राज्य सांभाळावं. तेलंगणामधील लोकांना सुविधा पुरवाव्यात. महाराष्ट्रासाठी काम करायला आम्ही समर्थ आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना फटकारलं आहे. केसीआर यांची पंढरपूरमध्ये सभा झाली. या सभेत केसीआर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूरमधल्या सरकोली गावात बीआरएस पक्षाची सभा झाली. भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी केसीआर यांनी सभेला संबोधित केलं. तेव्हा केसीआर यांनी राज्य सरकारसह सर्वच राजकीय पक्षांवर टीकास्त्र डागलं. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.

शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय का घेत नाही? वीज कंपन्यांचं खासगीकरण का करताय? आणि खासगीकरण करूनही शेतकऱ्यांना वीज का नाही मिळत, असे सवाल केसीआर यांनी महाराष्ट्र सरकारला विचारले. सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. याला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे.

निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण निवडणुका लढवल्यानंतर कुणाला निवडून द्यायचं याचा अधिकार जनतेला आहे. जनता याबाबत निर्णय घेत असते. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा अधिकार सर्वांना आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

BRS पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाला आहे. त्यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. त्याला शिंदेंनी उत्तर दिलं आहे. आधी त्यांचं स्वागत करत होते. घरात बोलून जेवायला द्यायचे आता भाजपची बी टीम कशी झाली?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

केसीआर किंवा अजून कुणीही आलं तरी आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे. जे काम करतं त्यांच्या पाठीशी जनता उभी राहाते. आमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे, असं शिंदे म्हणालेत.

पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. यावरून ठाकरे गटाने सरकारवर टीका केली. त्याला मुंबई तुंबली, ही तुमच्यामुळे… तुम्ही निर्णय घेतले नाहीत.. 15 वर्ष लोकांची लूट केली. हजारो कोटी रूपये मुंबईच्या जनतेचे ओरबाडले, असं म्हणत शिंदेंनी ठाकरे गटाला उत्तर दिलं आहे.