Ekanth Shinde : मिंध्यांनी पक्षांतर अन् ढोंगांतर केलं, हा ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल!; सामनातून शिंदेंवर टीकास्त्र

| Updated on: Oct 17, 2023 | 8:17 AM

Saamana Editorial on CM Ekanth Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करावा, इतिहासाची पाने चाळावीत, त्यांच्याच अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल!; सामनातून थेट निशाणा. शिंदे यांना खोचक सल्ला. पाहा काय म्हणालेत, खासदार संजय राऊत....

Ekanth Shinde : मिंध्यांनी पक्षांतर अन् ढोंगांतर केलं, हा माजवाद जनता कायमचा गाडेल!; सामनातून शिंदेंवर टीकास्त्र
Follow us on

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘मिंध्यांचे ढोंगांतर’ या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. आजच्या  या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळातील ग्रंथालयाचा वापर करा.  तेव्हा अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल , असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. मिंध्यांनी पक्षांतर केलं आणि ढोंगांतरही केलं. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल!, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटी राम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल . ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे . मिंध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले . त्यातून निर्माण झालेला ‘ माजवाद ‘ जनता कायमचा गाडेल!

मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय, असा दिव्य संदेश शिंदे यांच्या मिंध्या डोक्याने दिला.

हिंदुत्वाचे ‘मिलावटराम’ असा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्ताने त्यांना राम आठवला हे बरे झाले. अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेइमानी करणाऱ्यांना ‘नमकहराम’ म्हटले पाहिजे.

कश्मीरात कालच हिंदू व शिखांना नव्याने धमक्या देण्यात आल्या. ‘घराबाहेर पडाल तर याद राखा’ अशी पोस्टर्स कश्मीरातील हिंदूंच्या घराबाहेर लावण्यात आली, तर काही ठिकाणी हिंदूंनी आपली घरेदारे सोडावीत म्हणून दहशत सुरू आहे. त्यामागे पाकिस्तानचा अदृश्य हात आहे. तिकडे पाकडे हिंदूंना मारत आहेत व इकडे अहमदाबादेत मात्र पाकडय़ांवर फुले उधळून त्यांचे स्वागत होत आहे. मिलावटी मिंध्यांना हिंदुत्वातील ही भेसळ दिसू नये याचे आश्चर्यच वाटते.