इंदिरा गांधी यांची “अंधारातील शिकार”; पाकिस्तानने मागितला अर्धा हिस्सा, कोणता होता मोठा खजिना?

| Updated on: Jul 09, 2024 | 9:52 PM

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयगड किल्ल्यामध्ये खजिन्याची मोठी शोधाशोध केली. पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहून किल्ल्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागितला. पण... इंदिरा गांधी यांनी त्यांना उलट उत्तर पाठविले. ही होती अंधारातील शिकार...

इंदिरा गांधी यांची अंधारातील शिकार; पाकिस्तानने मागितला अर्धा हिस्सा, कोणता होता मोठा खजिना?
INDIRA GANDHI AND GAYATRI DEVI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुघल सम्राट अकबर (Mughal Samrat Akbar) याच्या कारकिर्दीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. जयपूरचा राजा मानसिंग I (Raja Mansing 1) हा सम्राट अकबर याचा एक बडा सरदार होता. राज मानसिंग हा जयपूरचा सरंजामदार (Jaipur Feudal Lord) होता. सम्राट अकबर याचे वडील बादशहा हुमायून (Badshaha Humayun) याने जयपूरच्या या सरंजामदार घराण्याला राजा ही पदवी दिली होती. मुघल शासकांशी हे घराणे एकनिष्ठ होते. त्यामुळे अकबर याने राजा मानसिंग I याला 1581 मध्ये एका मोहिमेवर पाठविले. अकबर याला काबूलच्या (Kabul) उत्तर – पश्चिम सीमेवर (सध्याचा अफगाणिस्तान – Afghanistan) मोठा विरोध होत होता. अनेक राज्ये, सरदार यांनी बंडे केली होती. त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अकबर याने राजा मानसिंग I याच्यावर सोपविली. राजा मानसिंग I याने काबुल मोहीम करून त्या बंडखोरांचा पराभव केला. त्याने अनेकांचा पराभव करून बराचसा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली आणला. या मोहिमेदरम्यान राजा मानसिंग याला काबूलमध्ये सोन्याचा मोठा खजिना सापडला. काबुल मोहीम संपवून सापडलेला खजिना घेऊन 1857 मध्ये राजा मानसिंग I भारतात परतला.

राजा मानसिंग यांचा मृत्यू

राजा मानसिंग I याने आपल्या आमेर किल्ला (अंबर – Ambar) किल्ल्यात हा सर्व खजिना सुरक्षित ठेवला. अंबर हा एक उंच टेकडीवर असलेला सर्वत सुरक्षित असा पर्वत दुर्ग होता. दुर्गच्या विशाल दरवाजा, खाली दगडी रस्ते आणि दुर्गच्या खाली असलेले भले मोठे मावठा सरोवर यामुळे किल्ला तसा अभेद्य होता. याच किल्ल्यात राजा मानसिंग याने हा खजिना लपवून ठेवला. विशेष म्हणजे सम्राट अकबर याच्यावर प्रचंड निष्ठा असूनही मानसिंग याने काबूल मोहिमेतून भारतात आणलेल्या सोन्याच्या या खजिन्याची माहिती लपवली. सम्राट अकबर याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सम्राट (Emperor Jahangir) झाला. त्याने राजा मानसिंग याला 1611 मध्ये दक्षिणेतील अहमदनगर मोहिमेवर पाठवले. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील अचलपूर येथे 17 जुलै 1614 रोजी त्याचा मृत्यू झाला.

ब्रिगेडियर भवानी सिंग यांचा परमवीर चक्र देऊन गौरव

राजा मानसिंग याच्या मृत्यूनंतर त्याने लपविलेल्या खजिन्याची बरीच मोठी चर्चा होऊ लागली. अंबर किल्ल्यावर सतत आक्रमणे झाली. पण, मानसिंग घराण्याने ती परतवून लावली. कालांतराने देशात इंग्रजांचे राज्य आले. त्यांनाही या खजिन्याची कुणकुण एका पुस्तकातून लागली. त्यामुळे त्यांच्या मनात खजिन्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यांनीही खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ गेला. 1947 मध्ये इंग्रजांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. जयपूरचा शासक सवाई मानसिंग II यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. जयपूर हे संस्थान भारताचा एक भाग झाले. सवाई मानसिंग यांचे पुत्र ब्रिगेडियर भवानी सिंग त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करताना पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजविला. या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली

1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी (Pm Indira Gandhi) यांनी भारतामध्ये देशव्यापी आणीबाणी लागू केली होती. नागरी स्वातंत्र्य कमी करण्यात आले होते. प्रेस रिपोर्ट्सवर बंदी घातली होती. जयप्रकाश नारायण (Jayprakash Narayan), अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), मोरारजी देसाई (Moraraji Desai) यासारख्या प्रमुख राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात असंख्य विरोधकांना देशातील विविध तुरुंगात ठेवण्यात आले होते. यामध्ये जयपूरच्या महाराणी गायत्री देवी (Maharani Gayatri Devi) यांचाही समावेश होता. ज्या घराण्यातील व्यक्तीला परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले त्याच घराण्यातील महाराणी गायत्री देवी यांनी इंदिरा गांधीना प्रखर विरोध केला होता.

महाराणी गायत्री देवी यांनी देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला होता. इंदिरा गांधी यांनी महाराणी गायत्री देवी यांच्यावर (COFEPOSA) कोफेपोसा (परकीय चलन संरक्षण आणि तस्करी क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) अंतर्गत परदेशी चलनाच्या प्रकरणात अटक केली. वास्तविक, महाराणी गायत्री देवी यांना अटक करणे हे एक निमित्त होते. कारण, इंदिरा गांधी यांनाही एका गोष्टीचा शोध घ्यायचा होता. तो म्हणजे राजा मानसिंग यांनी लपविलेला तो गुप्त खजिना.

आयकर विभागाचा छापा

जयपूरमधील सर्व किल्ले तेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात होते. पण, जयगड हा किल्ला जयपूर राजघराण्यातील गायत्री देवींच्या ताब्यात होता. राजा मानसिंग यांच्या मृत्यूनंतर अंबर किल्ल्यावर सतत आक्रमणे होत होती. त्यामुळे मानसिंग यांच्या घराण्यातील कुणा व्यक्तीने हा सर्व खजिना अत्यंत सावधपणे आणि गुपचूप जयगड किल्ल्यावर आणला होता. हीच खात्रीशीर माहिती इंदिरा गांधी यांना मिळाली होती. त्यामुळेच आणीबाणीच्या निमित्ताने महाराणी गायत्रीदेवी यांना अटक करून त्यांनी जयगड किल्ल्यावर शोध मोहीम हाती घेतली. याचा कुणाला संशय येऊ नये यासाठी आधी जयपूरच्या अंतापुरा येथे आयकर विभागाने छापा टाकला होता.

1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी जयपूरच्या जयगड किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खजिन्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. जयगड किल्ल्यावर सतत पाच महिने अहोरात्र खजिन्याची शोधाशोध सुरु होती. शोध मोहिमेत आयकर विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांचा सहभाग होता. अखेर, पुत्र संजय गांधी याच्या सल्ल्यानुसार इंदिरा गांधी यांनी लष्कर पाठविले. सैन्याने किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर घेरला. मात्र, यामुळे अंबरच्या सात जादुई खजिना शोधाची बातमी सर्वदूर पसरली. खजिन्याच्या शोधात संजय गांधी तेथे हेलिकॉप्टरमधून आले आणि निघून गेले. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळकटी मिळाली.

हे ही वाचा : प्रेमाचं आश्वासन देणं पडेल महागात… नव्या कायद्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांचे इंदिरा गांधी यांना पत्र

खजिन्याच्या या शोध मोहिमेची बातमी केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही जाऊन पोहोचली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी ऑगस्ट 1976 मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी “तुमच्या सरकारच्या आदेशानुसार जयपूरमध्ये उत्खनन होत असलेल्या खजिन्याबद्दल मी तुम्हाला लिहित आहे… मी तुम्हाला या खजिन्यातील वाटा मिळण्याचा पाकिस्तानचा अधिकार लक्षात घेण्याची विनंती करतो.” असे लिहिले होते. थोडक्यात त्यांनी या खजिन्यात आपला हिस्सा मागितला होता. कारण, फाळणीवेळी असा करार दोन्ही देशात अंमलात आणला गेला होता. मजेची गोष्ट म्हणजे ‘इस्लामिक रिपब्लिक’ने खजिन्याच्या अस्तित्वाची पुरेसी खात्री नसतानाही ही अवास्तव मागणी केली होती. इंदिरा गांधी यांना जशी जयगड किल्ल्यातील सोन्यावर नजर टाकली तशीच झुल्फिकार भुट्टो यांनीही त्या गुप्त खजिन्यावर नजर टाकली.

रावळपिंडीच्या या पत्राची विशिष्ट मागणी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फेटाळून लावली. त्यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या पत्राला उत्तर दिले. “मी आमच्या कायदेतज्ज्ञांना तुम्ही पाकिस्तानच्यावतीने मांडलेल्या दाव्याचा काळजीपूर्वक विचार करण्यास सांगितले. परंतु, तुम्ही सादर केलेल्या दाव्याला कायदेशीर आधार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे,” असे सांगत इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या त्या मागणीवर पाणी फेरले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी  TV9 मराठीचे News App डाऊनलोड करा.

इंदिरा गांधी यांची “अंधारातील शिकार”

पाच महिने शोध घेऊनही तो ‘खजिना’ सापडत नव्हता. जयगड किल्ला खोदून खोदून उद्ध्वस्त करण्यात आला. महाराणी गायत्रीदेवी यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाच महिन्यांहून अधिक काळ काढला होता. आणीबाणी उठवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अधिकृतपणे ‘जयगड किल्ल्यात कोणताही खजिना सापडला नाही. मात्र, केवळ 230 किलो चांदी सापडली असे सांगितले. जयगडमधील खजिन्याची शोधाशोध संपली. परंतु, जयपूरहून दिल्लीच्या दिशेने 50 ते 60 ट्रक धावत असताना दिल्ली – जयपूर महामार्ग एका दिवसासाठी का बंद ठेवण्यात आला यावर मात्र त्यांनी मौन बाळगले होते. आणीबाणीच्या काळात जयगड किल्ल्यावर माजी महाराणी गायत्री देवी यांना इंदिरा गांधी यांनी लक्ष्य केले. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी केलेली सोन्याची शिकार ही खरोखरच खजिन्याची शिकार होती की जादूटोणा होता याचे गूढ आजही कायम आहे… ‘जयगड, द इनव्हिन्सिबल फोर्ट ऑफ अंबर’ या पुस्तकाचे लेखक आर. एस. खंगरोट आणि पी.एस. नाथवत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात या प्रकरणाला “अंधारातील शिकार” असे म्हटले आहे आणि ते योग्यच आहे.

काही इतिहासकारांच्या मते राजा मानसिंग यांनी काबुल येथून आणलेला हा खजिना जयपूर शहर वसवण्यासाठी वापरला होता असे म्हणणे आहे. राजा मानसिंग यांनी बॅरकपूर, पटना येथे भवानी शंकर मंदिर बांधले. तर, बिहारमध्ये सुभेदार असताना तेथे रोहतासगड बांधला. वृंदावनमध्ये गोविंददेव मंदिर बांधले. ज्याची मूर्ती जयसिंगच्या काळात जयपूरला आणण्यात आली. अमेर येथे राजप्रसाद महल बांधला. मानसिंहने पुष्करमध्ये पॅलेस बांधला. त्याचप्रमाणे जयपूर आणि राजघराण्यातील पाहुणे यांच्या पुष्कर भेटीदरम्यान या राजवाड्याचा उपयोग निवासस्थान म्हणून केला जात असे. मानसिंग याने बहराइचमध्ये एक पंचमहाल बांधला. त्याला पाच छत्र्यांचा महाल असे म्हणतात. अकबर याने काही काळ या महालात वास्तव्य केले होते. राजा मानसिंग याची पत्नी कनकवती हिने त्याच्या स्मरणार्थ भगवान श्रीकृष्णाला समर्पित जगत शिरोमणी मंदिर बांधले होते.