“घोटाळ्यासाठी पैसे जमवणं हाच काँग्रेसचा अजेंडा”, नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, म्हणाले “सत्तेतून बाहेर पडल्यावर…”

| Updated on: Oct 05, 2024 | 6:44 PM

काँग्रेसने महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं. त्यांनी ज्या राज्यात सरकार बनलं त्या राज्यांना उद्ध्वस्त केलं, असा आरोपही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.

घोटाळ्यासाठी पैसे जमवणं हाच काँग्रेसचा अजेंडा, नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, म्हणाले सत्तेतून बाहेर पडल्यावर...
नरेंद्र मोदी, राहुल गांधी
Image Credit source: Facebook
Follow us on

PM Narendra Modi Thane Speech : “काँग्रेस निवडणुकीत मोठी आश्वासने देते पण सत्तेत आल्यावर लोकांचे शोषण करते. लोकांवर कर लादते. घोटाळ्यासाठी पैसा जमवणं हाच त्यांचा अजेंडा आहे”, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते ठाण्यात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे दौर करत आहेत. नुकतंच त्यांनी ठाण्यातील काही प्रकल्पांचे उद्धाटन केले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेससह महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली.

घोटाळ्यासाठी पैसा जमवणं हाच त्यांचा अजेंडा

“काँग्रेस ही सर्वात भ्रष्ट पार्टी आहे. कोणतंही राज्य असो काहीही असो काँग्रेसचं चरित्र बदलत नाही. काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचं जमीन घोटाळ्यात नाव आलं आहे. त्यांचा एक मंत्री महिलांना शिव्या देतो. हरियाणात एक नेता ड्रग्ससह पकडला आहे. काँग्रेस निवडणुकीत मोठी आश्वासने देते पण सत्तेत आल्यावर लोकांचे शोषण करते. लोकांवर कर लादते. घोटाळ्यासाठी पैसा जमवणं हाच त्यांचा अजेंडा आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारने हद्दच केली. काँग्रेसने हिमाचलमध्ये एक नवीन टॅक्स लावला आहे. त्यांनी टॉयलेट टॅक्स लावला आहे. एकीकडे मोदी म्हणतात टॉयलेट बनवा. आणि दुसरीकडे काँग्रेस त्यावर टॅक्स लावत आहे. कांग्रेस लूट आणि फसवणुकीचं एक पॅकेज आहे. तुमची जमीन हडप करेल, तरुणांना ड्रग्समध्ये ढकलतील आणि महिलांना शिव्या देतील. लूट आणि कुशासनचं पॅकेज ही काँग्रेसची ओळख आहे”, अशीही टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

“काँग्रेसने देशाला गरिबीत ढकललं”

मी गेल्या काही दिवसांचा काही पिक्चर तुमच्यासमोर ठेवला आहे. संपूर्ण नाही. कारण वेळेची मर्यादा आहे. काँग्रेस पूर्वीपासूनच हे करत आहे. महाराष्ट्रात आतापासूनच काँग्रेस रंग दाखवत आहे. महिलांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीपासून सावध राहावं. काँग्रेस जेव्हा सत्ते होती तेव्हा काँग्रेसला देशाच्या विकासापासून काय अडचण आहे असा सवाल केला जात होता. पण सत्तेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसचा रंग दिसत आहे. काँग्रेसला आता अर्बन नक्षलींची गँग चालवत आहे. काँग्रेस सरकार बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. अपयश आल्यानंतरही ते स्वप्न पाहत आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं एकच मिशन आहे. समाजात दुफळी निर्माण करा. लोकांना वेगळं करा आणि सत्ता काबीज करा. आपल्याला भूतकाळातून धडा घ्यायचा आहे. आपल्या एकतेला ढाल करायची आहे. आपल्यात फूट पडली तर आपल्यात फूट पाडणारे मैफल साजरी करतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं स्वप्न धुळीस मिळवा. काँग्रेसने देशाला गरिबीत ढकललं आहे. काँग्रेसने महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं. त्यांनी ज्या राज्यात सरकार बनलं त्या राज्यांना उद्ध्वस्त केलं, असा आरोपही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला.