महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी अपयशी; राज ठाकरे यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यावर निशाणा

| Updated on: Jul 26, 2023 | 1:22 PM

Raj Thackeray on Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते मंत्री महाराष्ट्राचा, पण राज्यात रस्ते नाहीत, हे दुर्दैवी; नितीन गडकरींवर टीका करताना राज ठाकरे यांनी बोलून दाखवली मनातली खंत...

महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी अपयशी; राज ठाकरे यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यावर निशाणा
Follow us on

पुणे | 26 जुलै 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील रस्ते आणि टोल या मुद्द्यांवर परखड भाष्य केलं. राज्यातील रस्त्यांची झालेली चाळण आणि ट्रॅफिकच्या समस्येवर बोलताना राज ठाकरे यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.

मला एक गोष्ट कळत नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री मराठी आहेत. महाराष्ट्रातील आहेत आणि महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत. या सारखं दुर्दैव नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी अपयशी झालेत. बांद्रा वरळी सी लिंक 10 वर्ष जातात आणि रामायणात सेतू पूल बांधण्यात आला पण रस्ते होईना, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.

मागच्या 17 वर्षांपासून मुंबई- गोवा रस्त्याचं काम सुरू आहे. एक रस्ता पूर्ण व्हायला 17 वर्षे लागतात? एक ठिकाणी तुम्ही रस्ता बनवता दुसऱ्या ठिकाणी बनवत नाही. मग हा बनवलेला रस्ता खराब होतो. हे किती दिवस चालणार? असं राज ठाकरे म्हणालेत.

आम्ही भूमिका घेतल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता… पण ज्यांनी टोल मुक्त महाराष्ट्र करू म्हणून सांगत होते. त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

तुमच्या सभांना गर्दी होते. मात्र त्याच मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही, असा सवाल विचारण्यात आला तेव्हा अटलबिहारी यांच्या पण भाषणाला गर्दी व्हायची. त्यांचं भाषण ऐकायला लोक यायचे. मात्र त्यांना 1999 साली थोडं यश मिळालं. नंतर आता 2014 ला भाजपची सत्ता आली. मला पण गर्दी होते ,इतर पक्षांना त्यांना पण विचारा कधी असे प्रश्न तुमच्या सभेला गर्दी होते, असं राज ठाकरे म्हणाले.

मला टोलबद्दल लोकांची भूमिका कळली पाहिजे. तेव्हा आम्ही भूमिका घेऊ शकू. सगळे निरडवलेले आणि निर्लज्ज आहेत. याला जबाबदार आपला समाज आहे. त्यामुळे त्यांना कळले की काही केलं तरी हे लोक आम्हला मतदान करणार आहेत. त्यामुळे राजकारणीही लोकांना गृहित घरत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.