4 राज्यांच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा’ निकालाची आम्हाला अपेक्षा

| Updated on: Dec 03, 2023 | 1:31 PM

Sharad Pawar on Assembly Election Result 2023 : चार राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, 'अशा' निकालाची आम्हाला अपेक्षा... ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवार काय म्हणाले?

4 राज्यांच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अशा निकालाची आम्हाला अपेक्षा
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 03 डिसेंबर 2023 :  देशातील चार राज्यांमध्ये सध्या निवडणूक होत आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय. काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये मात्र केसीआर यांच्या सत्तेला काँग्रेसने धक्का दिल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतं आहे. अशात या निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती, असं शरद पवार म्हणालेत. शरद पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे, असं शरद पवार म्हणाले.

तेलंगणाच्या निकालावर शरद पवार म्हणाले…

तेलंगणाच्या निकालावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांच्याकडे आताही सत्ता जाईल, असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी यांची हैदराबादला एक जाहीर सभा झाली. त्या सभेला लोकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर आम्हा लोकांची खात्रा झाली की, इथं परिवर्तन होईल, असं शरद पवार म्हणाले. आता तरी हे सुरुवातीचे कल आहेत. मात्र सध्याकाळी 5- 5.30 नंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की, लोकांना बदल हवा आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले

जिथं काँग्रेसचा पराजय झाला तिथं काँग्रेस नेते हा ईव्हीएमचा विजय असल्याचं म्हणत आहेत. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, हा मुद्दा माझ्याही कानावर आला आहे. पण या सगळ्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत या सगळ्याची विश्वासार्ह माहिती माझ्यापर्यंत येत नाही. तोवर सबंध यंत्रणेला मी दोष देणार नाही, असं शरद पवार म्हणाले.