‘शहीद’ अग्निवीर अजयचे कुटुंब म्हणाले? सरकार त्याला ‘शहीद’ म्हणत नाही, मग त्याला सीमेवर…

| Updated on: Jul 04, 2024 | 5:02 PM

लुधियानाच्या रामगढ सरदार गावातील बक्षो देवी यांचा अजय कुमार भाऊ. राहुल गांधी यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि संतापाचे भाव उमटले. अग्निवीर योजनेंतर्गत अजय कुमार भारतीय सैन्यात दाखल झाला होता.

शहीद अग्निवीर अजयचे कुटुंब म्हणाले? सरकार त्याला शहीद म्हणत नाही, मग त्याला सीमेवर...
rahul gandhi and pm narendra modi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अधिवेशनामध्ये अग्निवीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अग्निवीर शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबाच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या. लुधियानाच्या रामगढ सरदार गावातील बक्षो देवी यांचा अजय कुमार भाऊ. राहुल गांधी यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि संतापाचे भाव उमटले. अग्निवीर योजनेंतर्गत अजय कुमार भारतीय सैन्यात दाखल झाला होता. जानेवारी 2024 मध्ये जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात भूसुरुंग स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, अजय कुमार शहीद झाल्यानंतर कुटुंबाला ना पेन्शन देण्यात आली, ना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या. आमच्या भावाच्या मृत्यूबद्दल केंद्र सरकारने आमचे सांत्वनही केले नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लुधियानाच्या रामगढ सरदार गावातील अग्निवीर शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेचा मुद्दा उचलून धरला. ‘अग्निवीर जवान भूसुरुंगाच्या ‘स्फोटात’ शहीद झाला. मी त्या सैनिकाला ‘शहीद’ म्हणतो. पण, भारत सरकार त्याला ‘शहीद’ म्हणत नाही. नरेंद्र मोदी त्यांना शहीद म्हणत नाहीत. ते त्यांना अग्निवीर म्हणतात. त्यांना पेन्शन मिळणार नाही. नुकसानभरपाई मिळणार नाही. शहीदाचा दर्जा मिळणार नाही. सामान्य सैनिकाला पेन्शन मिळेल. भारत सरकार सर्वसामान्य सैनिकाला मदत करेल पण अग्निवीरला सैनिक मानता येणार नाही. अग्निवीर हा वापरून फेकून देणारा मजदूर आहे’ असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी सरकारवर चढविला होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘राहुल गांधी खोटी विधाने करून सभागृहाची दिशाभूल करत आहेत. युद्धादरम्यान आणि सीमेचे रक्षण करताना एखादा शूर सैनिक शहीद होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत दिली जाते, असे सांगितले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल हे दिशाभूल करत आहेत. संभ्रम पसरवत आहेत, असे म्हटले होते.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर शहीद अजय कुमार यांचे वडील चरणजीत सिंह यांनीही सरकारवर टीका केली. चरणजीत सिंह यांना 18 जानेवारीच्या दुर्दैवी संध्याकाळी त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्याचा तो क्षण अजूनही आठवतो. ते म्हणतात, “त्या संध्याकाळी मला फोन आला की भूसुरुंगाच्या स्फोटात तीन लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी एक तुमचा मुलगा आहे. अजय कुमार पाच बहिणींमध्ये सर्वात लहान होता. जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला ना पेन्शन देण्यात आली आहे. ना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या आहेत. आमच्या मुलाच्या मृत्यूबद्दल केंद्र सरकारने आमचे सांत्वनही केले नाही. तो अग्निवीर होता तर मग त्याला सीमेवर शत्रूंसमोर का तैनात करण्यात आले? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

कुटुंबाला मिळालेल्या आर्थिक मदतीबाबत चरणजीत सिंह सांगतात, ‘त्यांच्या कुटुंबाला पंजाब सरकारकडून 1 कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु, पंजाब सरकार आपल्या राज्यातील सर्व सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई देते असेही त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच लष्कराकडून त्यांना 48 लाख रुपये मिळाले. मात्र, केंद्र सरकारवर आम्ही नाराज आहोत. केंद्र सरकारने आम्हाला कोणतेही शोकपत्र दिले नाही. तुमचा मुलगा सीमेच्या रक्षणासाठी गेला याचे कोणतेही सांत्वन त्यांनी केले नाही, पेन्शनसारखे फायदे मिळाले नाहीत असेही त्यांनी सांगितले. अग्निवीर योजना रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, लष्कराने ट्विटरवर जारी केलेल्या पोस्टमध्ये “भारतीय लष्कर अग्निवीर अजय कुमार यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करते. पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्निवीर अजयच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या एकूण रकमेपैकी 98.39 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. अग्निवीर योजनेच्या तरतुदींनुसार पोलीस पडताळणीनंतर लगेचच अंतिम खाते सेटलमेंटद्वारे सुमारे 67 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम आणि इतर फायदे दिले जातील. एकूण रक्कम अंदाजे 1.65 कोटी रुपये असेल असे म्हटले आहे.